Skip to main content

पांढरे सोन शेतापासून ताटापर्यंत

नागपुरातील “कॉटन मार्केट” किंवा “महात्मा फुले मार्केट” हे विदर्भातील भाजीपाला विक्रीचे एक ऐतिहासिक ठिकाण किंवा बाजारपेठ. १८६१ मधे सुरू झालेल्या अमेरिकेतील “सिविल वॉर” मुले इंग्लडमधे कच्चा माल म्हणजे कापसाचा तुटवडा निर्माण झाला. परिणामी ब्रिटिश सरकारने कापसाच्या आयातीसाठी नागपूर ला प्राधान्य दिले आणि शुक्रवारी किंवा जुम्मा तलावाच्या बाजूला संपूर्ण विदर्भातून येणाऱ्या कापसाची बाजारपेठ भरू लागली. याच बाजारपेठेला समोर जाऊन कॉटन मार्केट असे नाव पडले. आता तिथे भाजीपाला विकला जातो, आणि एकेकाळी याच बाजारपेठेतून संपूर्ण विदर्भाची अर्थव्यवस्था चालत होती. नागपूर महानगर पालिकेच्या दस्तावेजनुसार १९२५ साली ७५,००० हून जास्त बैलगाड्या विदर्भातून कापूस विकायला नागपूरला आल्या होत्या. ब्रिटिश काळातील गॅझेट्स नुसार नागपूर जिल्ह्यात ८९ जिनिंग कंपन्या, आणि १,०६५ छोट्या-मोठ्या जीन होत्या. नागपूर मधे प्रक्रिया होणाऱ्या कापूस आयातीसाठीच नागपूर-मुंबई लोहमार्ग ब्रिटिशांनी सुरू केला. १८७७ साली टाटा समूहाने नागपूर मधे एम्प्रेस मिल सुरू केली, ही भारतातील पहिल्या कापड गिरण्यांपैकी एक. कापसापासून धागा आणि मग धाग्यापासून कापड आणि मग त्यापासून आपला पोशाख. ही साखळी तर आपल्या सर्वांना माहीत असतेच, पण कापसाच्या बियाणांचे काय होते याबद्दल फारशी माहिती नसते. जिनिंग या प्रक्रियेत कापूस आणि त्यातील सरकी (कापसाच बियाण) वेगळ केल जाते. कापूस जातो धागा बनवण्याच्या प्रक्रियेसाठी आणि सरकी जाते तेल गिरणीमध्ये त्यातून तेल काढण्यासाठी. जवळपास 1960-1965 पर्यंत कापसातून निघणारी सरकी ही सरळ दुभत्या गाई-म्हशींना खायला दिली जायची. सरकीमुळे दुधाची की गुणवत्ता टिकून राहते ही समज. याचा अर्थ असा की, शेतात आपण कपाशी लावायचो, कापूस बाजारात विकायचो आणि त्यातील सरकी गाई-म्हशींना खाऊ घालून, येणारे दूध पुन्हा आपल्या ताटात यायचे. यादरम्यान सरकीच्या तेलावर प्रक्रिया करण्याच्या नवीन पद्धती भारतात जम घेत होती. 60-70 च्या दशकात वनस्पती घी किंवा डालडा चा भारतीय बाजारपेठेत आणि भारतीय स्वयंपाकगृहात शिरकाव झाला होता. या वनस्पती घी साठी लागणारा कच्चा माल म्हणजे सरकीतून निघणारे तेल. स्वतः ची कुठलीच चव नसल्याने, उच्च तापमान सहन करण्याच्या गुणवत्तेमुळे आणि भारतात पिकणाऱ्या मुबलक कापसामुळे वनस्पती घी तूपाला स्वस्त पर्याय म्हणून प्रचलित झाले. सरकीतून तेल निघाल्यानंतर उरलेली ढेप ही पुन्हा दुभत्या जनावरांसाठी आणि मिळणार दूध आपल्यासाठी. दरम्यान च्या काळात बोंड अळीने कापसाच्या पिकावर आसूड घेणे सुरू केला आणि शेतकऱ्यांना त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कीटकनाशकांचा प्रचंड वापर करने सक्तीचे झाले. 2001 साली एकूण शेतजमिनीच्या 5 % जमिनीवर लागवड केलेल्या कापूस पिकाला संपूर्ण भारतात वापरलेल्या कीटकनाशकांपैकी 50 % कीटकनाशके लागली होती. 1995 मधे अमेरिकेत आणि 1997 मधे चिन या देशात बीटी कापसाला परवानगी मिळाली. भारतात २००२ साली भारत सरकारने बीटी कापसाच्या पेरणीला अधिकृतरित्या परवानगी दिली, पण छुप्या मार्गाने हे बियाणे आधीच भारतातील मोठे क्षेत्र व्यापून बसले होते. ब्यासिलस थुरिंगेसिस(Bacillus thuringiensis) या जीवाणूचे विषारी जनुके कापसाच्या बियाण्यात घातले गेले. संपूर्ण झाड, मुळापासून बियाण्यापर्यंत, या विषारी प्रथिनांनी ने भरलेलं. प्रयत्न असा की जेव्हा बोंड अळी कापसाच्या बोंडाला खाईल तेव्हा त्याचा मृत्यु होईल आणि सुरुवातीला असे झाले सुद्धा.पण गुलाबी बोंड अळीवर बीटी मधल्या प्रथिनांच्या काहीही उपयोग होत नाही, परिणामी पुन्हा कीटकनाशकांचा उपयोग भरमसाट वाढला आणि आपण परत बीटी च्या आधीच्या कीटकनाशकांच्या विळख्यात जाऊन अडकलो. या सर्व भानगडीत सर्वात जास्त कुणाचे नुकसान झाले असेल तर ते आपल्या विदर्भातील शेतकरी बंधू-भगिनींचे. या अन्नसाखळी किंवा कापसाच्या साखळीचा पहिला माणूस म्हणजे शेतकरी. तो दरवर्षी बीटी कापसाचे बियाणे विकार घेतो. खूप सारे खत-कीटकनाशके विकत घेतो आणि जेव्हा बाजारात कापसाला भाव मिळत नाही तेव्हा कर्जाच्या चक्रात ओढला जातो. 1865 साली अमेरिकन “सिविल वॉर” संपल्यानंतर युरोपात पुन्हा अमेरिकन कापसाला पसंती दिल्या गेली आणि मुंबईत लोकांचे 45.80 कोटी रुपये बुडाले होते. कदाचित आपण तेव्हाच त्यातून धडा घेऊन कापूस या खर्चिक पिकावर इतकं अवलंबून राहायला नको होत. आजही जागतिक बाजारपेठेत अमेरिकन कापसासमोर आपला निभाव लागत नाही आणि अतिशय कमी भावात आपल्याला कापूस विकावं लागतो. बीटी कापसाच्या चक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांनी कुठला मार्ग अवलंबला आहे हे आपल्याला ठाऊकच आहे व विदर्भाचे नाव सुध्दा जागतिक पटलावर शेतकरी आत्महत्येमुळे वारंवार येत असतेच. आता परत येऊ बीटी सरकी कडे. कृषि-जैव प्रौद्योगिकी अनुप्रयोग संपादन आंतरराष्ट्रीय सेवा (ISAAA) च्या अभ्यासानुसार नुसार भारताने २००२ ते २०२० दरम्यान २०.७८ मिलियन मेट्रिक टन बीटी बियाणांचे तेल उत्पादित केलं. म्हणजे गेल्या दोन दशकांत भारतात जे सरकीचे तेल वापरले गेले ते सरळ बीटी कापसापासून आलेले. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) ने स्पष्ट सांगितलेले आहे की बीटी कापसाच्या तेलाचा खाद्य तेलात वापर करू शकत नाही, तर मग इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माण होणारे बीटी कापसाचे तेल जाते तरी कुठे ? डाऊन टू अर्थ (Down To Earth) ने केलेल्या चाचणीमध्ये नमुन्यांतील 32 % नमुन्यात अनुवांशिकरित्या सुधारित जीव (GMO) चे अंश आढळले आहेत. भारतात एकमेव अधिकृत जीएमओ आहे ते म्हणजे बीटी कापूस. म्हणजेच एकेकाळचे पांढरे सोन आज थोड्या प्रमाणात का होईना विषारी बीटी कापसाच्या तेलाच्या रूपाने आपल्या स्वयंपाकगृहात पर्यंत पोहोचतोय, कायद्याने बंदी असताना सुद्धा आणि ढेपेतून दुधाच्या स्वरूपातून. २००६ साली आंध्र प्रदेशातील वारंगल जिल्ह्यातील चार गावांत कापूस काढणी झाल्यावर शेतकऱ्यांनी आपल्या मेंढ्यांना उरलेल्या पिकावर चरायला सोडलं(Penning), जसं ते वर्षानुवर्षे करत होते. काही दिवसांत त्या मेंढ्या आजारी पडल्या आणि त्यानंतर मृत्यू झाल्या. सामाजिक संस्थेच्या च्या तथ्य-शोध अहवालानुसार फक्त चार गावांत किमान १,८२० मेंढ्या मृत्युमुखी पडल्या होत्या. आंध्र प्रदेश राज्य फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळा (APSFSL) इंडियन ग्रासलैंड एंड फोडर रिसर्च इंस्टीट्यूट' (IGFRI) आणि आचार्य एन. जी. रंगा कृषि विश्वविद्यालय (ANGRAU) या संस्थांना बीटी कापसाच्या रोपांमध्ये मध्ये नायट्रेट्स, नायट्राइटस आणि ऑर्गनोफॉस्फेट सापडले आहेत. ही जीवितहानी बीटी कापसाला लागणाऱ्या कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे झाली होती होतं. २०१८ मध्ये तेलंगणा राज्यात नलगोंडा जिल्ह्यात पुन्हा हाच प्रकार घडला, तीन दिवसांत ३०० मेंढ्या मृत्यमुखी पडल्या. आणखी एक म्हणजे बीटी कापसाच्या साठवलेल्या ढेप साठवणुकीत पुरेशी काळजी घेतली नाही तर एस्प्रिगिलस फंगस (Aspergillus fungus) वाढतो आणि त्यातून अफ्लाटॉक्सिन (Aflatoxin) तयार होते. दुभते जनावर ही ढेप खातं आणि अफ्लाटॉक्सिन (Aflatoxin) थेट दुधात येतं. जागतिक आरोग्य संस्थेनुसार (WHO) याने कर्करोग होतो. तुर्कस्तानात झालेल्या अभ्यासात म्हशीच्या दुधामध्ये अफ्लाटॉक्सिन (Aflatoxin) सापडलं आहे. आज आपल्या विदर्भात दरवर्षी कितीतरी शेतकरी आत्महत्या करतात. त्याच कापसाच्या शेतात. पण ही फक्त शेतकऱ्यांची गोष्ट नाही, ही आपल्या सगळ्यांच्या ताटापर्यंत पोहोचलेली गोष्ट आहे. कारण कापसाचं विष आता फक्त शेतात नाही ते आपल्या तेलात आहे, दुधात आहे, जनावरांच्या चाऱ्यात सुद्धा आहे. कळत-नकळत एकेकाळी कॉटन मार्किट, मॉडल मिल, एम्प्रेस मिल ला मिरवणारे नागपूरकर आज त्याच कापसाच्या विषारी विळख्यात अडकुन बसले आहेत. Loksatta Link

Comments

Popular posts from this blog

अव-काळाचे आर्त : स्वातंत्र्य-सुरक्षिततेचा सवाल!

तुमच्या स्वत:च्या अपत्याचे नाव ठेवायची परवानगी तुम्हाला नसेल तर काय होईल? किंवा नेमकी पाच-सहा नावेच सर्वांना वाटून दिली, तर? किती लोकांची नावे समान असतील? सपाट समानतेचा हाच डिस्टोपियन धागा पकडून आयरा लेविन यांनी ‘धिस परफेक्ट डे’ ही कादंबरी गुंफलेली आहे. १९६९ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीला तत्कालीन शीतयुद्धाची पाश्र्वभूमी आहे. त्यात स्टालिनवादानुसार चालणाऱ्या एका, भविष्यातल्या विश्वरूपी व्यवस्थेची कल्पना केली आहे, त्या व्यवस्थेला ‘कुटुंब’ असे म्हटले जाते. त्या कुटुंबातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय मायबाप सरकार घेताना दिसते. ‘चिप’ नावाच्या एका पुरुषाच्या आयुष्याभोवती ही कादंबरी फिरते. शाळेच्या पटांगणात खेळणाऱ्या चिप आणि इतर मुलांच्या संभाषणांतून समाजातील लोक दोन भागांत विभागले गेल्याचे वाचकाला दिसते. ज्याप्रमाणे हल्ली आपण धर्म, जात, वर्ण, पक्ष, देश आणि इतर गोष्टींच्या आधारे ‘ते आणि आम्ही’ अशा विभागण्या सहजगत्या करतो, अगदी त्याचप्रमाणे कादंबरीमध्ये ‘रोगट आणि निरोगी’ अशी लोकांची विभागणी दिसते. जगातील काही व्यक्ती एका असाध्य रोगाने पछाडलेल्या आहेत, अशी कादंबरीतली ...

अव-काळाचे आर्त : चंगळवादाचे थैमान…

संपूर्ण जग विकून हडप केलेल्या समाजाचे पाय कोणत्या दिशेने जाऊ शकतात, याचे विवेचन मांडण्याचा प्रयत्न म्हणजे- ‘द स्पेस मर्चंट्स’! पृथ्वी आणि पृथ्वीवरील संपूर्ण संसाधने ही फक्त मानवाच्या उपभोगासाठीच आहेत असा समज असलेल्या आणि नीतिमत्तेची चाड न बाळगणाऱ्या समाजाचे विवरण लेखकाने ‘द स्पेस मर्चंट्स’मध्ये केले आहे. या कादंबरीचा नायक एका मोठ्या जाहिरात कंपनीमध्ये उच्चपदस्थ आहे. सकाळी उठल्यापासून ज्या-ज्या वस्तूंचा किंवा संसाधनांचा उपभोग मनुष्य घेतो, ती-ती वस्तू वा संसाधन जास्तीत जास्त लोकांना विकण्याचे काम ही जाहिरात कंपनी करत असते. फ्रेडरिक पोल आणि सीरील कॉर्नब्लथ लिखित, १९५३ साली प्रथम प्रकाशित झालेल्या, ‘द स्पेस मर्चंट्स’ या कादंबरीमध्ये चंगळवादामुळे निर्माण झालेल्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीचे वर्णन करण्यात आले आहे. पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधने जवळपास संपुष्टात आल्याने उपभोगासाठी नवीन संसाधने मिळावीत या हेतूने सूर्यमालेतील इतर ग्रहांच्या शोधात विविध देशांतील सरकारे आणि संलग्न कंपन्या यांमध्ये स्पर्धा सुरू असते. या स्पर्धेच्या अवतीभोवती ही कादंबरी गुंफलेली आहे. कादंबरीचा नायक म्हणजेच मिच कोर्टेने...

सेंद्रिय अन्न: काळाची गरज

 गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, सुरक्षित अन्न या चळवळींनी शेतकरी-ग्राहकांमध्ये शेती आणि अन्नप्रणाली बद्दल मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण केली आहे. अगदी दहा वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजेच २०१२-१३ साली कच्च्या घाणीच्या तेलाचा किंवा सेंद्रिय शेतमालाचा साधा कुठे उल्लेख पण होत नव्हता आणि आज नागपूर मध्ये आपल्याला ठिकठिकाणी कच्च्या घाणीच्या तेलाचे आणि सेंद्रिय शेतमालाचे दुकान दिसायला लागले आहे. बाजारभावापेक्षा थोडा महाग असून सुद्धा लोकांचा कल या उत्पादनांकडे वाढतांना दिसतो आहे. मानवी आणि एकंदर पृथ्वीच्या आरोग्याचा विचार केला तर सध्याची आपली वाटचाल हि बरीच आशादायी आहे.   याच काळात कर्करोग, मधुमेह आणि इतर रोगांचा सुळसुळाट पण भरपूर वाढलेला दिसतो आहे. काही वर्षांपूर्वी कर्करोग व मधुमेह हे श्रीमंत आणि शहरी लोकांचे आजार समजले जायचे. आज परिस्थिती अशी आहे की कर्करोगाच्या निदानात फार नाविन्य राहिलेलं नाही आणि मधुमेह तर आज सर्वसामान्य होऊन बसला आहे. आज या रोगांची विभागणी शहरी किंवा ग्रामीण अशी होऊ शकत नाही. आपल्या आहारात वाढलेल्या साखर, मीठ आणि चरबीच्या प्रमाणामुळे व ...