2014 साली मी चंद्रपूर च्या ताडोबा अभयारण्यात वाघ बघायला गेलो होतो. गब्बर नावाचा वाघ छोट्या पाण्याचा डोहात शांतपणे बसून होता. सुरुवातीच्या 4-5 मिनिटांत माझ्या मधे असलेली नैसर्गिक अधिवासात वाघाला बघण्याची उत्सुकता थोड्या प्रमाणात कमी झाल्यानंतर माझा मेंदू गब्बर ला सोडून परिसरातील आजूबाजूच्या बाबींची सुद्धा नोंद घ्यायला लागला आणि अगदी थोड्याच वेळात मला गुन्हेगार असल्यासारखं वाटायला लागल. एका वाघाला बघायला जवळपास चाळीस-पन्नास सफारीच्या गाड्या होत्या अणि प्रत्येक गाडी वाघाची एखादी छान फोटो घेण्याचा नादात एकमेंकावर चढाओढ करून गब्बर च्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होत्या. करिश्माई किंवा आकर्षक प्राण्याच्या यादीत असल्याने आणि अन्न साखळीच्या अगदी शीर्षस्थानवर असल्याने वाघाच्या संवर्धनात आणि त्याला बघण्यात आपण नेहलीच अग्रेसर असतो. यामुळेच गेल्या काही वर्षात वाघांची संख्या वाढत आहे आणि सोबतच आपल्या नागपूरचा रुबाब सुद्धा
नागपूर हे जगातील कदाचित एकमेव शहर असेल ज्याच्या शंभर किलोमीटर परिसरात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. पेंच नागपूर जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरच आहे. बोर अवघ्या पंचावन्न किलोमीटरवर. उमरेड-कऱ्हांडला शहराला जवळजवळ लागूनच. ताडोबा, मेळघाट, नागझिरा-नवेगाव, सहाही प्रकल्प नागपूरच्या अवतीभवती. त्यामुळेच नागपूरला जगातील वाघांची राजधानी ("Tiger Capital of the World") म्हणून नावाजले जाते. हे बिरुद नागपूरच्या बाहेरील लोकांसमोर मिरवायला छान वाटते किंवा संवर्धन आणि प्रवास बद्दल लिहिण्याऱ्या नियतकालिकांमध्ये मध्ये छान दिसते, राजकीय मंचावर किंवा सभांमहदे मध्ये टाळ्या मिळवते. पण त्या बिरुदाचा खरा अर्थ आणि त्यातून निर्माण होणारी जबाबदारी पार पाडण्यात कमी पडलो किंवा आपण कधी नीट समजून घेतलीच नाही. वर्तमानपत्रात दररोज वाघाच्या किंवा बिबटच्या हल्ल्यात कुणीतरी जखमी झाल याबद्दल बातमी ठरलेलीच आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या वाघाच्या संवर्धनाच्या प्रयत्नातून फक्त वाघ नाही तर वाघाच्या अन्नसाखळीतील इतर प्राण्यांचे सुध्दा संवर्धन होतेच आणि त्यासोबतच प्रश्न उद्धभवतो “मानव आणि वन्यप्राणांच्या” संघर्षाबद्दल. सध्याची परिस्थिती बघितल्यास समोरील काही वर्षात नागपूर आणि नागपूर लगतच्या लोकांसाठी हा प्रश्न कदाचित आपल्या आकलण्याच्या बाहेर जाण्याची दाट शक्यता दिसत आहे. वाघ वाढत आहे हे खरे आहे.
2025 च्या डिसेंबर मधे नागपूरच्या पारडी भागात एक बिबटा गल्लीत शिरला होता. त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्नात सात माणसे जखमी आणि चार तास त्या बिबट्याला जेरबंद करण्यात गेले होते. त्याच सुमारास भांडेवाडीत एका बिबट्याला बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर पाहण्यात आले होते. त्याच्या आधी कोरडी वीज निर्मिती केंद्राच्या भिंतीजवळ बिबट्याचे महिनाभर वास्तव्य होते. नरेंद्र नगरमध्ये बिबटा. बोरीत वाघ. उमरेड रस्त्यावर वाघ आणि याप्रकारचे असंख्य उदाहरणे मिळतील. बिबट्याचे शहरी-मानवी वस्तीतला इतकं सहज शिरकाव, वाघांचे सतत होणारे हल्ले आणि वन्यप्राण्यांमुळे होणारे शेतीचे नुकसान हे स्वतःमधे एक-एकटे अपघात आहेत की अन्नसाखळी, अन्नव्यवस्था, संवर्धन, शहर विस्तार याला तुकड्या-तुकड्यात बघण्याचे एकंदरीत परिणाम ? याबद्दल विचार करण्याची आज नितांत गरज आहे.
वाघाबद्दल बद्दल बोलायचे झाले तर तो आपल्याप्रमाणे एका 2000 स्क्वेर फुट च्या घरात, एका गुफेत किंवा एका झाडाखाली राहणारा प्राणी नाही आहे. एका नर वाघाचा अधिवास आणि वावर तीनशे ते पाचशे चौरस किलोमीटर परिसरात असतो. तो पेंच ते नागझिरा, ताडोबा ते बोर याप्रकारे एका अभरण्यातून दुसऱ्यात फिरतो आणि दुसऱ्यातून तिसऱ्यात फिरत असतो. ते करत असतांना तो शिकार करतो, नवा अधिवास शोधतो आणि सोबतच जोडीदर शोधतो. या प्रवासाला एक विशिष्ट रस्ता आहे. जंगल, नदीकाठ, शेतजमीन, झुडपी जंगल इत्यादी हे त्याचे नैसर्गिक भ्रमणमार्ग(Corridors) आहेत. हजारो वर्षांपासून वाघ या वाटेने चालत आला आहे. ही वाट त्याला माहीत आहे, त्याच्या आधीच्या पिढ्यांना माहीत होती. आणि आज आपण त्याच्या वाटेत ठाम मरून बसलो आहे. कान्हा-पेंच, नवेगाव-नागझिरा आणि बोर-मेळघाट यातून होणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या भ्रमणमार्गांना राष्ट्रीय महामार्ग 6 आणि 7 च्या चैपड्रीकरणाने थेट कापले आहे. तज्ञांच्या मते या भ्रमणमार्गांवर वाघांची हालचाल ही सर्वाधिक आहे आणि याच भ्रमणमार्गांवर आपण उठून बसलो आहे. आता तर चंद्रपूर-नागपूर या नवीन मार्गामुळे ताडोबा-अंधारीच्या भ्रमणमार्गांना धक्का लागणार आहे त्यात जवळसपास बत्तीस हजार झाडे तोडली जाणार आहे. रस्त्याने भ्रमणमार्ग कापला की वाघाला पर्याय उरत नाही. त्याला रस्ता ओलांडण्यात अडचण येते, परिणामी तो इतरत्र फिरतो, मानवी वस्तीत शिरतो आणि मग वन्यप्राणी-मानव. संघर्ष सुरू होतो. हे वाघाचे किंवा वन्यप्राण्यांचे आक्रमण नसून आपल्या शाश्वत नसलेल्या शैलीचे उदाहरण आहे. नागपूरचे गोरेवाडा, एम्बाझरी हे सुद्धा भ्रमणमार्गचाच भाग आहेत. वन्यजीवांसाठी शहरातून भ्रमण करतांना हा हरित दुआ आहे. नागपुरातील नवीन पडणारे लेआउट, सदनिका आणि बाह्य रस्त्यांमुळे फक्त आठ टक्के जमीन हरित आहे आणि ती पण तुकड्यात विखुरलेली आहे. वाघांची संख्या वाढत आहे हे खरे आहे. २०१० मध्ये देशात १,७०६ वाघ होते आणि आजचा अंदाज 3682 आहे. वाघांच्या वाढत्या संखेमुळे बरेचशे बिबटे हे जंगलाच्या सीमेवर यायला लागले आहे आणि त्याच बिबट्यांना गावालगत गुरांच्या माध्यमाने सहज भक्ष्य सुद्धा मिळत आहे. महाराष्ट्र राज्यचा देशात वाघांच्या संखेत तिसऱ्या क्रमांक लागतो, व सोबतच विदर्भातील जंगलांमध्ये वाघांची संख्या लक्षणीयरित्या वाढली पण त्याचबरोबर जंगल किंवा वन्य प्राण्यांचा अधिवासाचे क्षेत्रफळ वाढले काय ? गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ४२० माणसे मारली गेली, हा आकडा सरकारने दिलेला विधान परिषदेतीळ आकडा आहे. वाघाने २४८, बिबट्याने १०४. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात २०२५ साली ४७ माणसे मारली गेली. त्याच वर्षी विदर्भात २६ वाघ मृत्यू पावले. सपळ्यात सापडून, विष-बाधेने, रस्ता किंवा लोहमार्ग ओलांडतांना इत्यादी.
याला आणखी एक समांतर धागा आहे तो म्हणजे भांडेवाडी, जिथे पूर्ण नागपूर चा कचरा साठवला जातो किंवा कचऱ्याचे व्यस्थापन केल्या जाते. नागपूरपासून दहा किलोमीटरवर भांडेवाडी कचरा डेपो (Dumping Yard) आहे. इथे दररोज १,२०० ते १,४०० मेट्रिक टन घनकचरा आणला जातो. या कचऱ्यात आपल्या रोजच्या स्वयंपाकगृहातील ओला-सुखा कचरा, खाणावळीतील अन्न, मटण आणि मच्छी बाजारातील कचरा, कत्तलखाना आणि कधी कधी मृत जनावर यांचा सुद्धा यांचा समावेश असतो. ओला कचरा, सुका कचरा सगळे एकत्र, सगळे उघड्यावर. भांडेवाडी परिसरातील लोकांनी वारंवार याबद्दल आक्षेप घेतलाच आहे. हे सगळ उमरेड-करहंडला लगतच्या भ्रमणमार्गाच्या थेट तोंडावर. याचा परिणाम सरळ एका रेषेत दिसतो. उधड्यावरील अन्नाच्या वासाने साठी भटक्या कुत्र्यांना आमंत्रण मिळतेआणि कुत्र्यांसाठी बिबटे येतात. तज्ञ लोकांच्या मते भांडेवाडी परिसरात जवळपास पाच ते सात बिबटे कायमचे वास्तव्यास आहेत. हे फक्त नागपूर मध्येच होत आहे असे नाही. जंगलात पुरेसे अन्न मिळत नसल्याने बर्याच वन्य प्राण्यांची पसंती कचरा डेपोतील सहज मिळणाऱ्या अन्नाला म्हणजेच आपण योग्यरित्या व्यवस्थापन न केलेल्या कचऱ्याला असते. मुंबईतील आरे भागात 56 कचरा व्यवस्थापन्याचा जागेजवळ बिबट्याचे वास्तव्य आढळून आले. डेहराडून, रायपूर, राजाजी नॅशनल पार्क, मुन्नार, पल्लाकड आणि भारतातील बऱ्याच ठिकाणी कचरा डेपोत हत्ती, बिबट्या, हरिण, माकड, अस्वल, गवा इत्यादी प्राणी नेहमीच दिसत असतात. श्रीलंका या देशात सुद्धा हत्तीबाबत हेच होतांना दिसत आहे. त्यामुळे ओल्या घन कचऱ्याचे व्यस्थापन हे संवर्धन प्रयत्नांच्या, शहर विस्तार नियमांच्या समन्वयातून होण्याची मोठी गरज आहे. नाहीतर नागपूरसारख्या मध्यभागी असलेल्या शहरात मानव-वन्यप्राणी संघर्ष आणखी तीव्र होत जाईल.
वाघ आणि संवर्धन, वन्यप्राणी-मानव संघर्ष, शेतीचे रक्षण आणि करावयाची जागली किंवा जागल, जंगलातील विविधता आणि आरोग्य, शहरातील कचरा व्यवस्थापन याला तुकड्या-तुकड्यात बघण्याची आणि त्यावर मर्यादित असलेल्या उपाययोजनांचा आज आपल्या सर्वांनाच फटका बसतो आहे. त्यामुळे सहअस्तित्वाचा धागा पकडून, आपले परंपरागत ज्ञान वापरून, विकेंद्रित त्या-त्या ठिकाणची सर्वसमावेशक उपाययोजना उभारण्याची मोठी आणि तातडीची जबाबदारी आपल्यावर आहे.
Loksatta Link
तुमच्या स्वत:च्या अपत्याचे नाव ठेवायची परवानगी तुम्हाला नसेल तर काय होईल? किंवा नेमकी पाच-सहा नावेच सर्वांना वाटून दिली, तर? किती लोकांची नावे समान असतील? सपाट समानतेचा हाच डिस्टोपियन धागा पकडून आयरा लेविन यांनी ‘धिस परफेक्ट डे’ ही कादंबरी गुंफलेली आहे. १९६९ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीला तत्कालीन शीतयुद्धाची पाश्र्वभूमी आहे. त्यात स्टालिनवादानुसार चालणाऱ्या एका, भविष्यातल्या विश्वरूपी व्यवस्थेची कल्पना केली आहे, त्या व्यवस्थेला ‘कुटुंब’ असे म्हटले जाते. त्या कुटुंबातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय मायबाप सरकार घेताना दिसते. ‘चिप’ नावाच्या एका पुरुषाच्या आयुष्याभोवती ही कादंबरी फिरते. शाळेच्या पटांगणात खेळणाऱ्या चिप आणि इतर मुलांच्या संभाषणांतून समाजातील लोक दोन भागांत विभागले गेल्याचे वाचकाला दिसते. ज्याप्रमाणे हल्ली आपण धर्म, जात, वर्ण, पक्ष, देश आणि इतर गोष्टींच्या आधारे ‘ते आणि आम्ही’ अशा विभागण्या सहजगत्या करतो, अगदी त्याचप्रमाणे कादंबरीमध्ये ‘रोगट आणि निरोगी’ अशी लोकांची विभागणी दिसते. जगातील काही व्यक्ती एका असाध्य रोगाने पछाडलेल्या आहेत, अशी कादंबरीतली ...

Comments
Post a Comment