हा स्तंभ सुरु व्हायच्या आधी मला विचारण्यात आलेलं कि स्तंभाचे नाव काय असेल तर मी क्षणाचाही विचार न करता "वर्गवारी" हे नाव सांगून दिले.
पण नंतर मात्र दोन-तीन मित्रांसोबत या नावाबद्दल थोडा विचारविमर्श केला तर त्यांचे म्हणणे असे पडले कि "वर्गवारी" हा शब्दच जरा भारी होतोय आणि या शब्दाचा आपल्या जीवनातील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असलेला संबंध सर्वाना कळेलच असे नाही. वरून "वर्ग" हा शब्द जरा डाव्या विचारसरणीचा वाटतो त्यामुळे डाव्या विचारसरणीचा शिक्का लागेल ते वेगळच. मग मी स्तंभाचे नाव बदलण्याचा विचार करत होतो पण मला पुन्हा प्रश्न पडला कि असं हे गोड-गोड लिहून किंवा प्रश्नाला सरळ हात न लावून पण किती दिवस चालणार
? कधीतरी हे करावे लागणारच आणि एकदा काय जातिव्यवस्थेप्रमाणे स्तिथी हाताबाहेर गेली कि बराच उशीर होऊन गेलेला असेल,
म्हणून मी याच शीर्षकाखाली लिहायच हा निर्णय घेतला.
तर नेमका मुद्दा हाच आहे कि आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रस्थापित वर्गवारी मध्ये इतके गुंफले गेलेलो आहे कि आपण या वर्गवारीचा एक अविभाज्य घटक असून आपण स्वतः पण वर्गवारीला पूरक असेच काम किंवा कृती करतो हे आपल्याला गवसत सुद्धा नाही.
गेल्या सदरात शेती,
जंगल, माणूस, पशु यातल्या वर्गवारीबद्दल लिहले तर चक्क काही लोक फक्त मला मारायचे तेवढे शिल्लक राहिले.
जेव्हा शेती, जंगल आणि वन्य पशु च्या वर्गवारीबद्दल लिहिने इतकं वादग्रस्त आहे तर माणसा-माणसात असलेली आर्थिक,
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैयक्तिक आणि विविध रूपे धारण केलेली वर्गवारी किती जटील आणि भयानक असेल याचा अंदाज आपल्याला बांधता येतो.
जेव्हा आपण एका विशिष्ठ उच्चं वर्गात
(सामाजिक, आर्थिक किंवा वैयक्तिक) मोडले जातो तेव्हा समाजात अस्तित्वात असलेल्या विविध वर्गवारीमुळे होणाऱ्या त्रासाची झळ आपल्याला कधीच पोहचत नाही. वर्गवारीचा त्रास सोसणारा किंवा अन्याय सहन करणारा हा नेहमीच वर्गवारीत खालच्या थराला असतो. समाजाच्या होणाऱ्या हानी बद्दल किंवा वर्गवारीच्या अस्तित्वाचा आपल्याला विसर पडलेला असतो. म्हणूनच समाजातील दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या वर्गवारीबद्दल प्रकर्षाने लिहणे, त्याला प्रकाशझोतात आणणे आणि त्यावर उपाययोजना करणे हि आज काळाची गरज होऊन बसली आहे.
आपल्या भारत देशात जातीव्यवस्था हि भरपूर मजबूत आहे. कामानुसार आणि व्यवसायानुसार अस्तित्वात आलेली जातीव्यवस्था समोर जाऊन वर्गवारीला जन्म देईल याचा विचार देखील आपल्या पूर्वजांनी केला नसेल. पण सत्तेच्या आणि शक्तीच्या हव्यासापोटी या जातीव्यवस्थेत काही लोकांनी शक्कल लढवत काही विशिष्ट काम अति महत्त्वाचे आणि काही काम कमी महत्त्वाचे अशी आखणी केली आणि त्यातून वर्गवारीला सुरुवात झाली. जातिव्यवस्थेच्या बाहेर पडून लवकरच वर्गवारीने मानवी जीवनातील सर्वच क्षेत्रात आपली जागा निर्माण केली आणि आधी फक्त जातिव्यवस्थेमुळे अस्तित्वात असलेली अमानुष वागणूक आणि अपमान आता इतर वर्गवारीनेही लोकांना मिळायला सुरुवात झाली.
स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर जातीय वर्गवारी बद्दल बरच लिहलं जात आहे आणि त्या वर्गवारीला नाहीस करण्याचे किंवा लवचिक करण्याचे प्रयत्न सुद्धा होत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर,
जोतिबा फुले आणि विविध समाजसुधारकांच्या प्रयत्नाने जातीय वर्गवारीला भेदण्याचा प्रयत्न झाला आहे. पण इतर स्वरूपातील वर्गवारीला भेदणे सुद्धा समाजात न्याय,
बंधुता, स्वातंत्र्य आणि समता टिकवण्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे.
आर्थिक सुबत्ता,
शैक्षणिक पात्रता, लिंग, विचारसरणी, ग्रामीण- शहरी, बोली भाषा,
राजकीय संबंध, व्यवसाय, कामाचे स्वरूप,
राहणीमान, रंगरूप अश्या बऱ्याच नवीन वर्गवाऱ्या उदयास आलेल्या आहे ज्याने समाज आणखी अनेक तुकड्या-तुकड्या मध्ये विभाजित होत आहे. उदाहरण म्हणजे काही विशिष्ट विचारसरणीचे किंवा व्यवसायातील लोक स्वतःला अतिशय तत्ववादी, प्रामाणिक आणि महत्वाचे समजतात.
पण तेवढ्यावरच ते न थांबून इतर व्यवसायाला किंवा विचारसरणीला दुय्यम मानून त्यांना नेहमी हिणवण्याचा सारखा प्रयत्न होत असतोच. अश्या या विविध तुकड्या तुकड्या मध्ये विभागलेल्या समाजाचे एक पाऊल पुढे न जाता मागेच जाताना दिसत आहे. जातीव्यवस्थेतील वर्गवारीसाठी नियम आणि कायदे असल्याने त्यावर अंकुश ठेवायला किंवा त्यातील त्रुटी सुधारण्यास मदत झाली पण इतर स्वरूपाच्या वर्गवारीबद्दल कधीच बोलले जात नाही किंबहुना त्याबद्दल विचार पण केला जात नाही त्यामुळे आपण या प्रकारच्या वर्गवारीला बळी पडतोय हेसुद्धा आपल्याला कळत नाही.
म्हणूनच "वर्गवारी".
https://www.esakal.com/authors/aakaash-nvghre
Comments
Post a Comment