Skip to main content

स्वार्थापोटी

गेल्या 1 महिन्यापासून संपूर्ण भारतात इंडियन प्रिमियर लीग चा धुमाकूळ दिसतोय. यूरोपियन फुटबॉल च्या धर्तीवर भारतात सुद्धा शहरानुसार व्यावसायिक तत्वावर क्रिकेट खेळण्यास सुरुवात झाली. विविध शहरानुसार संघ व खेडाळू वाटले गेले. हा पूर्ण प्रकार अगदी व्यावसायिक तत्वावर सुरू असतो. यात देशाचा अभिमान किंवा शहराचा अभिमान वगैरे काहीच नसते. केवळ मनोरंजन हा हेतु लक्षात घेऊन या  लीग चे आयोजन केले जाते. गेल्या आठवड्यात चेन्नई आणि कोलकाता या दोन संघात एक सामना झाला व कोलकाता संघाने चेन्नई संघावर मात केली. चेन्नई संघाचा कर्णधार आहे महेंद्रसिंह धोनी व त्याला ५ वर्षाची छोटी मुलगी आहे. हा पराभव काही लोकांनी इतका मनावर लावून घेतला की चक्क धोनीच्या मुलीला सार्वजनिकरित्या नको त्या धमक्या देण्यात आल्या. कामगिरीसाठी संघाची किंवा संघातील खेडाळूंची टीका करणे हे साहजिकच आहे. पण एका व्यावसायिक संघाच्या पराभवाबाबत इतके वाईट वाटणे आणि त्यामुळे खेडाळूंच्या घरच्यांना धमकी देणे हा सर्वच प्रकार आज आपण कुठल्या प्रकारच्या समाजात राहतो याची जाणीव करून देते.

गेल्या काही वर्षापासून नको त्या खालच्या पातळीवर जाऊन धमक्या देण्याच्या प्रकारांमधे प्रचंड वाढ झालेली दिसत आहे. प्रसिद्ध असलेल्या ख्यातनाम लोकांनासुद्धा असल्या प्रकाराला नेहमीच सामोरे जावं लागतं, विशेषकरून महिलांना. जेव्हा प्रसिद्ध आणि शक्तीशाली लोकांनासुद्धा याला तोंड द्यावे लागते, तर सामान्य लोकांची आणि विशेषकरून सामान्य मुली व महिलांची काय अवस्था होत असेल याची बहुतेक आपण फक्त कल्पनाच करू शकतो. आश्चर्य म्हणजे हे सर्व प्रकार दिवसेंदिवस अगदी सामान्य होत चालले आहेत. पण असे का व्हावे ? गेल्या काही वर्षात असे काय घडले की ज्यामुळे ही बाब अगदी आता अगदी सामान्य नेहमीची वाटते ? आपण एक समाज म्हणून कुठे चुकलो का ?

कुणीही क्षुल्लक कारणांसाठी लगेच इतक्या खालच्या खालच्या स्तरावर जाऊन कुणालाच धमकी देऊ शकत नाही. क्वचितच एखादा मनोरोगी किंवा माणुसकी नसलेला व्यक्ति याप्रकारे वागू शकतो. पण इतक्या सहजरीत्या अनेक लोकांकडून येणार्‍या अश्या धमक्या हे त्यांना कुठल्याच प्रकारची भीती शिल्लक राहिलेली नाही याचे प्रतीक आहे. धोनी सोबत जे काही घडले ते आपल्या देशात प्रथमच घडत आहे असं नाही. एका मोठ्या राजकीय पक्षाच्या निकटवरतीय लोकांकडून हे वारंवार केलं जातं. तोच राजकीय पक्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये धोनीला त्यांचा उमेदवार बनवू इच्छित होते आणि त्याने निवृत्ती पत्करल्या नंतर पुन्हा त्याला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार बनवू इच्छित आहे. जेव्हा एक मोठा राजकीय पक्ष अश्या गतीविधींना अभय देतो आणि धोनी सारखे शक्तीशाली मंडळी फक्त गप्प बसून बघ्याची भूमिका घेतात तेव्हा हा सर्व प्रकार त्याच्या व त्याच्यासारख्या इतर लोकांच्या अंगावर येणार हेही तितकेच खरे. देशात इतरत्र जेव्हा अश्या प्रकारच्या घटना घडत होत्या तेव्हा जर धोनीने अश्या घटनांवर टीका केली असती तर कदाचित धोनीला अशी वेळ बघायला मिळाली नसती.

या धोनी प्रकरणातून आणि अश्या बर्‍याच अनुभावातून हा प्रश्न निर्माण होतो की “आपल्याला आपला मोठा स्वार्थ का दिसत नाही ?” का आपण आपल्या छोट्या आणि क्षुल्लक स्वार्थासाठी भविष्यावर आळा आणतो ? कुणाच्या भावना दुखावू नये किंवा कुणाला वाईट वाटू नये म्हणून का नेहमीच सत्याला कानाडोळा करायचा ? माझा मित्र, माझा भाऊ, माझा मुलगा फक्त यांचाच विचार करून का आपण  नेहमी समाजात सत्तेची, संपत्तीची, शक्तीची असमानता निर्माण करतो ? विविध प्रकारच्या असमानतेने, अशांततेने, द्वेषाने ग्रासलेल्या समाजात कुणीच सुरक्षित राहू शकत नाही. धोनी, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, दक्षिण आफ्रिका, ब्राजील हे सगळे याचे जीवंत उदाहरणे आहेत.

सत्ता, संपत्ति आणि इतर बाबी या क्षणिक आनंद देऊन जातात पण आपले खरे स्वार्थ हे स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, स्वच्छ अन्न, शांतिप्रिय समाज, सामाजिक आणि आर्थिक समानता यामध्येच आहे. त्यामुळे नेहमीच क्षुल्लक स्वार्थाला बळी न पडता कधीतरी मोठा स्वार्थ लक्षात घेऊन पण विचार आणि कृती करण्याची गरज आहे.

 


https://www.esakal.com/authors/aakaash-nvghre

Comments

Popular posts from this blog

सेंद्रिय अन्न: काळाची गरज

 गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, सुरक्षित अन्न या चळवळींनी शेतकरी-ग्राहकांमध्ये शेती आणि अन्नप्रणाली बद्दल मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण केली आहे. अगदी दहा वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजेच २०१२-१३ साली कच्च्या घाणीच्या तेलाचा किंवा सेंद्रिय शेतमालाचा साधा कुठे उल्लेख पण होत नव्हता आणि आज नागपूर मध्ये आपल्याला ठिकठिकाणी कच्च्या घाणीच्या तेलाचे आणि सेंद्रिय शेतमालाचे दुकान दिसायला लागले आहे. बाजारभावापेक्षा थोडा महाग असून सुद्धा लोकांचा कल या उत्पादनांकडे वाढतांना दिसतो आहे. मानवी आणि एकंदर पृथ्वीच्या आरोग्याचा विचार केला तर सध्याची आपली वाटचाल हि बरीच आशादायी आहे.   याच काळात कर्करोग, मधुमेह आणि इतर रोगांचा सुळसुळाट पण भरपूर वाढलेला दिसतो आहे. काही वर्षांपूर्वी कर्करोग व मधुमेह हे श्रीमंत आणि शहरी लोकांचे आजार समजले जायचे. आज परिस्थिती अशी आहे की कर्करोगाच्या निदानात फार नाविन्य राहिलेलं नाही आणि मधुमेह तर आज सर्वसामान्य होऊन बसला आहे. आज या रोगांची विभागणी शहरी किंवा ग्रामीण अशी होऊ शकत नाही. आपल्या आहारात वाढलेल्या साखर, मीठ आणि चरबीच्या प्रमाणामुळे व ...

अहोभाग्य

आपला समाज हा असंख्य अश्या विविध वर्गांमधे आणि तुकड्यांमधे विभागलेला आहे . गेल्या १८ स्तंभातून आपण समाजात अस्तीत्वात असलेल्या वेगवेगळ्या वर्गवार्‍यांवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण ज्या वर्गात मोडतो त्याचे काही फायदे व काही तोटेसुद्धा असतातच. या फायद्या आणि तोट्याचे प्रमाण हे आपण कुठल्या वर्गात मोडतो त्याच्यानुसार नेहमी बदलत असते. काही फायदे आणि तोटे हे निव्वळ आपण कुठल्या धर्मात आणि जातीत जन्म घेतला आहे यावर अवलंबून असतात व त्यात आपण फार बदल करू शकत नाही. याचप्रमाणे आपण कुठे राहतो ( शहर किंवा गाव ), आपल्या आजूबाजूला असलेल्या सोयी-सुविधा , आपल्या घरी असलेली शिक्षणाची परंपरा अश्या अनेक मोजता न येणार्‍या बाबीं आपल्या जीवनातील फायदे आणि तोटे ठरवत असतात. यापैकी कुठलीच परिस्थिति ही आपण स्वइच्छेने निवडलेली नसते. आपल्या परिसरातील सोयी-सुविधा सोडल्या तर बाकी सर्वच बाबी या आपल्याला जन्मजात मिळालेल्या असतात. नशीब बलवत्तर असल्यास आयुष्यभर तुम्हाला फायदे होत राहणार नाहीतर बाकी वर्गवार्‍यांसोबत या वर्गवारीला सामोरे जावे लागेल हे नक्की. एखाद्या व्यक्तीचे मूल्यमापन होत असतांना किंवा ए...

अव-काळाचे आर्त : स्वातंत्र्य-सुरक्षिततेचा सवाल!

तुमच्या स्वत:च्या अपत्याचे नाव ठेवायची परवानगी तुम्हाला नसेल तर काय होईल? किंवा नेमकी पाच-सहा नावेच सर्वांना वाटून दिली, तर? किती लोकांची नावे समान असतील? सपाट समानतेचा हाच डिस्टोपियन धागा पकडून आयरा लेविन यांनी ‘धिस परफेक्ट डे’ ही कादंबरी गुंफलेली आहे. १९६९ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीला तत्कालीन शीतयुद्धाची पाश्र्वभूमी आहे. त्यात स्टालिनवादानुसार चालणाऱ्या एका, भविष्यातल्या विश्वरूपी व्यवस्थेची कल्पना केली आहे, त्या व्यवस्थेला ‘कुटुंब’ असे म्हटले जाते. त्या कुटुंबातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय मायबाप सरकार घेताना दिसते. ‘चिप’ नावाच्या एका पुरुषाच्या आयुष्याभोवती ही कादंबरी फिरते. शाळेच्या पटांगणात खेळणाऱ्या चिप आणि इतर मुलांच्या संभाषणांतून समाजातील लोक दोन भागांत विभागले गेल्याचे वाचकाला दिसते. ज्याप्रमाणे हल्ली आपण धर्म, जात, वर्ण, पक्ष, देश आणि इतर गोष्टींच्या आधारे ‘ते आणि आम्ही’ अशा विभागण्या सहजगत्या करतो, अगदी त्याचप्रमाणे कादंबरीमध्ये ‘रोगट आणि निरोगी’ अशी लोकांची विभागणी दिसते. जगातील काही व्यक्ती एका असाध्य रोगाने पछाडलेल्या आहेत, अशी कादंबरीतली ...