गेल्या सदरात काम आणि काम करण्याचा पद्धतीमध्ये कश्याप्रकारे नीती आणि मूल्यांची सोयीस्कर सांगड घालून काही विशिष्ट कामे हि अति महत्त्वाचे आणि बाकी सारे दुय्यम अशी वर्गवारी तयार करण्यात आली आहे किंवा घडलेली हे आपण बघितलं, हि वर्गवारी तर कामाकडे बघणाच्या दृष्टिकोनातून घडलेली आहे. पण हे इथेच थांबते काय तर मुळीच नाही. कामाची परिभाषा, कौशल्य आणि काम करून मिळणार मोबदला यात पण वर्गवारी आहेच. कामाच्या मोबदल्यात मिळणाऱ्या देयकांबद्दल बोललं तरी जाते पण कौशल्य आणि कामाची परिभाषा याबद्दल फारसा कुणी विचार करताना दिसत नाही, आणि याबद्दल भविष्यात पण फार काही होईल असे चित्र सध्या तरी दिसत नाही आहे. वर्गवारिचे नुकसान सोसनाऱ्या वर्गाला बहुतेकदा याबाद्द्दल माहिती नसते आणि असली तरी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या मूलभूत गरज पूर्ण करण्यातच त्यांचा बराचसा वेळ आणि ऊर्जा निघून जाते. ज्यांना खरोखर वर्गवारीबद्दल माहिती असते त्यांना बहुतेकदा वर्गवारीमुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या फायदाच होत असतो म्हणून तो स्वतः असलेल्या सोयीस्कर वर्गात खिंडार पाडू इच्छित नाही. परिणामी हि वर्गवारी अशीच बरीच वर्षे लांबत राहील.
प्रत्येक कामाचे एक
विशिष्ट कौशल्य असते. आणि बऱ्याचदा त्या कौशल्या ला धरून व्यक्तीला मोबदला मिळत
असतो. उदाहरणार्थ स्थापत्य अभियंता एका मोठ्या बांधकामाचे डिझाईन तयार करतो. तो
त्यामध्ये सुरक्षितता, खाली असणारी माती, लागणारा कच्चा माल वगैरे
बऱ्याच बाबीचा विचार करूनच डिझाईन ला अंतिम रूप देत असतो. पण प्रत्यक्ष बांधकाम
करताना गवंडी (मिस्त्री ) आणि हातमजूर हेच लोक या सगळ्या बाबी काळजीपूर्वक
हाताळतात. डिझाईन कितीही उत्तम असेल पण जर गवंड्या ने बांधकामात गुरुत्व मध्य (center of gravity ) चुकवला तर पूर्ण बांधकाम हे धोक्याचे होते. पण तितकेच
तोडीचे आणि महत्त्वाचे काम करणाऱ्या गवंड्याला समाजात ना ती प्रतिष्ठा मिळते ना तो
मोबदला. फरक फक्त इतकाच असतो कि अभियंता हा कुठल्या तरी प्रस्थापित संस्थेतून
प्रमाण भाषेतून शिकलेला असतो आणि गवंडी हा काम करताना त्याचा अनुभवातून शिकत असतो.
समाज म्हणून आपण जसजसा
विकास करतो आहे तशतशे कामाचे नवीन नवीन क्षेत्र उदयास येत आहे. सामाजिक काम, विकासात्मक काम, शाश्वत विकासात्मक काम, कार्पोरेट काम वगैरे
वगैरे. आता या वेगवेगळ्या कामाच्या वेगवेगळ्या परिभाषा समाज स्वतःच्या सोयीनुसार
करून घेत असतो. सध्या बरच डोक्यावर घेतलेलं काम म्हणजे सामाजिक काम. त्याला थोडी
नीती आणि मूल्याची जोड दिल्या गेली आणि पावित्र्याचा भास निर्माण केला गेला , म्हणजे एकंदर उरलेल्या
इतर प्रकारच्या सर्व कामाला ते किती नीतिहीन आणि मूल्यहीन आहे असे हिणवण्यासाठी
आपण मोकळे. एखादा सामाजिक प्रश्न घ्यायचा आणि त्याचे प्रमाणाबाहेर उदात्तीकरण
करायचे, म्हणजे पुन्हा त्या प्रकारचं काम करणारे आणि न करणारे अशी
नवीन वर्गवारी तयार. शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्राचा उपयोग असाच होताना
दिसतोय. त्यात आणखी भर म्हणजे जर तुम्ही हेच काम जर ग्रामीण भागात करत असाल तर
अगदी सोने पे सुहागा(च). शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात काम करत असाल तर तुम्ही
सामाजिक कार्यकर्ते आणि शेती किंवा उपजिविका या क्षेत्रात काम करत असेल तर त्याच
काय ? नागपूर शहरात दोन
मुली मिळून लहान मुलांमध्ये आणि सोबत पालकांमध्ये
वाचनाची सवय रुजावी म्हणून स्वखर्चातून एक ग्रंथालय चालवतात. त्या ग्रामीण
भागात पण राहत नाही आणि कॉर्पोरेट जगात काम पण करतात मग अश्या प्रकारच्या कामाला
काय म्हणावं ? शेतीच्या प्रश्नावर काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आणि
स्वतः शेतकरी जो सर्वांचे पोट भरतो तो कोण ? ग्रामीण भागात जाऊन
तुम्ही मुलांना शिकवत असाल तर तुम्ही सामाजिक कार्यकर्ता पण सरकारी शाळेत कित्येक
शिक्षक ग्रामीण भागात जाऊन शिकवतात ते कोण ? फक्त सरकारी कर्मचारी
असल्याने ते महत्त्वाचे नाही आणि आपण कुठल्यातरी
सामाजिक संस्थेत काम करतो म्हणून आपण सामाजिक कार्यकर्ता.
सर्व प्रकारचे काम हे इतर
सर्व प्रकारच्या कामावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या अवलंबून असतेच. प्रत्येक
काम हे आपापल्या ठिकाणी तितकेच महत्त्वाचे आहे. कुठलेही एक काम थांबले कि समाजाचा
गाडा सुरळीत चालू शकणार नाही. त्यामुळे मी
करतो ते अमुक काम श्रेष्ठ व नीती-मूल्याचे आणि बाकी सगळे निरर्थक हे समाजासाठी
घातकच आहे. अश्या प्रकारचे सामाजिक प्रश्नाचे उदात्तीकरण थांबवणे हि काळाची गरज
होऊन बसलेली आहे.
क्रमश
Comments
Post a Comment