Skip to main content

सत्यगाथा

तीन महिन्यांपूर्वी म्हणजे जून महिन्यात एका भारतीय कलाकाराचा मृतदेह त्याच्या खोलीत सापडला. त्याचा खून झाला किंवा त्याने आत्महत्या केली हे अद्याप कळलेले नाही. तेव्हापासून संपूर्ण भारताला किंवा भारतातील माध्यमांना फक्त आणि फक्त त्या घटनेचे वेध लागलेले दिसत आहेत. त्या घटनेनंतर कोरोंना,  पुरस्थिती, बेरोजगारी, डबघाईला आलेली अर्थव्यवस्था अशी बरीच संकटे सतत भारताला प्रश्न विचारात आहे. इतके असूनही अपवाद एक दोन माध्यमे सोडली तर कुणीच या खर्‍या प्रश्नांबद्दल बोलत नाही आहे. हा जोमात सुरू असलेला खेळ सर्वांनाच माहिती आहे, तरी मी हे लिहिण्याचा खटाटोप का करतोय हे बघूया.

महात्मा गांधीजींचे तीन माकड हे भारतात बरेच प्रसिद्ध आहे. या तीन माकडांपैकी एकाने त्याचे डोळे झाकलेले आहे, दुसर्‍याने कान झाकलेले आहे तर तिसर्‍याने तोंड झाकलेले आहे. या तीन माकडांच्या तत्वज्ञानाचे मूळ जपान या देशातील आहे. साधारण १७ व्या शतकापासून या तत्वज्ञानाचा उपयोग होताना दिसतोय. हे उदाहरण “वाईट बघू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका” अशी शिकवण देते. शांतता आणि सहनशीलतेच्या प्रचारात या तत्वज्ञानाचा महात्मा गांधींनी उपयोग केला. स्वातंत्र्यपूर्व काळात समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी नक्कीच या तत्वाची गरज होती आणि त्याला यश सुद्धा मिळाले. भारतीय समाजाने उत्तमरीत्या हे तत्वज्ञान अंगीकृत केलेलं दिसतेय, फक्त त्याची दिशा थोडी भरकटत गेली. या उदाहरणातील वाईट हा शब्द गळून त्याची जागा आता “सत्य” या शब्दाने घेतलेली आहे. आणि एक नवीन तत्वज्ञान किंवा एक नवीन जगण्याचा मार्ग यातून निर्माण झाला तो म्हणजे “सत्य बघू नका, सत्य ऐकू नका आणि सत्य बोलू नका”.

२०१३ साली एडवर्ड स्णोडेण या अमेरिकन व्यक्तीने अमेरिकन गुप्तचर संस्था कश्याप्रकारे काही जागतिक पातळीच्या संस्थांसोबत मिळून लोकांवर पाळत ठेवत आहे हे उघडकीस आणले होते. याप्रकारचे प्रयत्न इतरत्रही होतांना दिसत असतातच. जरी एडवर्ड स्णोडेण या व्यक्तीने लोकहितासाठी हे प्रकरण उघडकीस आणले, पण त्यालाच खलनायक म्हणून घोषित करण्यात आले. त्याच्यावर देशद्रोहाचा आणि असे विविध खटले चालवण्यात आले. तर मुद्दा असा की सत्याची बाजू घेऊन आणि खरे बोलून त्याने स्वतःच्या पायावर जणूकाही कुर्‍हाड मारून घेतली. अशी उदाहरणे आपल्याला समाजात सर्वत्रच दिसून येतात. अगदी छोट्या छोट्या स्वार्थासाठी आणि हितसंबंधासाठी आपण सत्याची बाजू घेत नाही. खूप हिम्मत करून कुणी सत्य बोलायचा प्रयत्न केला तर त्याचे भयंकर दुष्परिणाम त्या व्यक्तिला सोसावे लागतात. हे बघून मग इतर कुणी सत्याची बाजू घेण्यासाठी प्रयत्नसुद्धा करत नाही.     

वर नमूद केलेला कलाकाराच्या विषयाला किती महत्त्व द्यायचे हे मी ठरवू शकत नाही आणि त्याचा मला अधिकार पण नाही. सध्या भारताची परिस्थिति बघितली तर आपल्या देशाला भेडसावणारे अगदी मूलभूत असे बरेच प्रश्न आहे.  ते सर्व प्रश्न विसरून भारतीय समाज आणि माध्यमे फक्त त्या कलाकाराच्या घटनेला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सतत चालवत बसले आहेत. त्या घटनेबद्दल कितीही चर्चा केली तरी त्यातून सकारात्मक काहीच निघणार नाही तरीही इतक्या उत्स्फूर्तेपणे का सर्वच त्यामध्ये सहभागी होत असतील ? तर त्याचे कारण असे की त्या चर्चेमध्ये सहभागी होण्याकरिता तुम्हाला कुठलीच सत्याची बाजू घ्यावी लागत नाही आणि खोट्या अर्धसत्य गोष्टीचे मनोरे बांधायचे स्वप्न पूर्ण होते ते वेगळच.

एक समाज म्हणून आणि एक देश म्हणून आपण सध्या खूप कठीण परिस्थितीतून जात आहोत. एक सुजाण नागरिक म्हणून आवश्यक त्या वेळेवर सत्याची बाजू न घेतल्याने आज आपला देश वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक खड्ड्यात जात आहे. पण याची सुरुवात बरीच आधी झाली होती. जेव्हा स्वतःचा स्वार्थ आणि हितसंबंध जोपासणे हे प्राथमिक झाले अगदी तेव्हापासूनच आपल्या समाजाची अधोगती सुरू झाली होती. आता जे काही दिसत आहे ते तर त्याचे फक्त परिणाम आहेत, आणि त्या परिणामांची तीव्रता दिवसेंदिवस आणखी जाणवायला लागणार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सरकारी मालमत्तेचे खाजगीकरण, कोसळती न्यायव्यस्था ही तर जणू सुरुवात आहे. इतके सगळे होऊनही आपण सत्याची बाजू घेऊ शकत नसू तर आपल्या देशाचे आणि समाजाचे काही खरे नाही.

त्यामुळे क्षुल्लक स्वार्थासाठी आणि हितसंबंध जोपासण्याएवजी सत्याची बाजू घेणे, त्याबद्दल चर्चा करणे आणि योग्य तो निर्णय घेणे ही काळाची गरज होऊन बसली आहे.

Comments

Popular posts from this blog

सेंद्रिय अन्न: काळाची गरज

 गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, सुरक्षित अन्न या चळवळींनी शेतकरी-ग्राहकांमध्ये शेती आणि अन्नप्रणाली बद्दल मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण केली आहे. अगदी दहा वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजेच २०१२-१३ साली कच्च्या घाणीच्या तेलाचा किंवा सेंद्रिय शेतमालाचा साधा कुठे उल्लेख पण होत नव्हता आणि आज नागपूर मध्ये आपल्याला ठिकठिकाणी कच्च्या घाणीच्या तेलाचे आणि सेंद्रिय शेतमालाचे दुकान दिसायला लागले आहे. बाजारभावापेक्षा थोडा महाग असून सुद्धा लोकांचा कल या उत्पादनांकडे वाढतांना दिसतो आहे. मानवी आणि एकंदर पृथ्वीच्या आरोग्याचा विचार केला तर सध्याची आपली वाटचाल हि बरीच आशादायी आहे.   याच काळात कर्करोग, मधुमेह आणि इतर रोगांचा सुळसुळाट पण भरपूर वाढलेला दिसतो आहे. काही वर्षांपूर्वी कर्करोग व मधुमेह हे श्रीमंत आणि शहरी लोकांचे आजार समजले जायचे. आज परिस्थिती अशी आहे की कर्करोगाच्या निदानात फार नाविन्य राहिलेलं नाही आणि मधुमेह तर आज सर्वसामान्य होऊन बसला आहे. आज या रोगांची विभागणी शहरी किंवा ग्रामीण अशी होऊ शकत नाही. आपल्या आहारात वाढलेल्या साखर, मीठ आणि चरबीच्या प्रमाणामुळे व ...

अहोभाग्य

आपला समाज हा असंख्य अश्या विविध वर्गांमधे आणि तुकड्यांमधे विभागलेला आहे . गेल्या १८ स्तंभातून आपण समाजात अस्तीत्वात असलेल्या वेगवेगळ्या वर्गवार्‍यांवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण ज्या वर्गात मोडतो त्याचे काही फायदे व काही तोटेसुद्धा असतातच. या फायद्या आणि तोट्याचे प्रमाण हे आपण कुठल्या वर्गात मोडतो त्याच्यानुसार नेहमी बदलत असते. काही फायदे आणि तोटे हे निव्वळ आपण कुठल्या धर्मात आणि जातीत जन्म घेतला आहे यावर अवलंबून असतात व त्यात आपण फार बदल करू शकत नाही. याचप्रमाणे आपण कुठे राहतो ( शहर किंवा गाव ), आपल्या आजूबाजूला असलेल्या सोयी-सुविधा , आपल्या घरी असलेली शिक्षणाची परंपरा अश्या अनेक मोजता न येणार्‍या बाबीं आपल्या जीवनातील फायदे आणि तोटे ठरवत असतात. यापैकी कुठलीच परिस्थिति ही आपण स्वइच्छेने निवडलेली नसते. आपल्या परिसरातील सोयी-सुविधा सोडल्या तर बाकी सर्वच बाबी या आपल्याला जन्मजात मिळालेल्या असतात. नशीब बलवत्तर असल्यास आयुष्यभर तुम्हाला फायदे होत राहणार नाहीतर बाकी वर्गवार्‍यांसोबत या वर्गवारीला सामोरे जावे लागेल हे नक्की. एखाद्या व्यक्तीचे मूल्यमापन होत असतांना किंवा ए...

अव-काळाचे आर्त : स्वातंत्र्य-सुरक्षिततेचा सवाल!

तुमच्या स्वत:च्या अपत्याचे नाव ठेवायची परवानगी तुम्हाला नसेल तर काय होईल? किंवा नेमकी पाच-सहा नावेच सर्वांना वाटून दिली, तर? किती लोकांची नावे समान असतील? सपाट समानतेचा हाच डिस्टोपियन धागा पकडून आयरा लेविन यांनी ‘धिस परफेक्ट डे’ ही कादंबरी गुंफलेली आहे. १९६९ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीला तत्कालीन शीतयुद्धाची पाश्र्वभूमी आहे. त्यात स्टालिनवादानुसार चालणाऱ्या एका, भविष्यातल्या विश्वरूपी व्यवस्थेची कल्पना केली आहे, त्या व्यवस्थेला ‘कुटुंब’ असे म्हटले जाते. त्या कुटुंबातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय मायबाप सरकार घेताना दिसते. ‘चिप’ नावाच्या एका पुरुषाच्या आयुष्याभोवती ही कादंबरी फिरते. शाळेच्या पटांगणात खेळणाऱ्या चिप आणि इतर मुलांच्या संभाषणांतून समाजातील लोक दोन भागांत विभागले गेल्याचे वाचकाला दिसते. ज्याप्रमाणे हल्ली आपण धर्म, जात, वर्ण, पक्ष, देश आणि इतर गोष्टींच्या आधारे ‘ते आणि आम्ही’ अशा विभागण्या सहजगत्या करतो, अगदी त्याचप्रमाणे कादंबरीमध्ये ‘रोगट आणि निरोगी’ अशी लोकांची विभागणी दिसते. जगातील काही व्यक्ती एका असाध्य रोगाने पछाडलेल्या आहेत, अशी कादंबरीतली ...