गेल्या काही वर्षापासून लोकांचा किंवा कमीत कमी भारतीय लोकांचा तरी कल हा विशिष्ट प्रकारच्या होणार्या घटनांच्या(Events) बाजूने जास्त दिसतोय, आणि हा प्रकार चोहीकडे आहे. सरकारी प्रणाली, खाजगी कंपनी, निवडणुका, सामाजिक संस्था आणि इतरत्रही, जणूकाही समाजाला मोठमोठ्याला सतत होणार्या घटनांची भूल पडली आहे किंवा सवय झाली आहे.
घटना(Event) ही एका विशिष्ट मर्यादित वेळेला घडते
आणि त्यातून काही तरी अपेक्षित असतेच असे नाही. बर्याचदा काहीही समोर मागे
नसतांनाही घटना घडवल्या जातात किंवा साजर्या केल्या जातात. मागील कित्येक
वर्षापासून कुठल्या तरी प्रक्रियेचा भाग म्हणून किंवा प्रक्रियेचे फलित म्हणून
घटना घडायच्या किंवा साजर्या केल्या जायच्या, त्यामुळे
त्यामागे काही कारणे असायची, त्यातून काही तरी अपेक्षित
असायचे. पण आता असे दिसत नाही प्रक्रियेला डावलून उथळ घटनांना जास्त महत्व दिले
जात आहे त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेमुळे सुटणारे प्रश्न किंवा प्रक्रियेमुळे
वाढणारी क्षमता आणि होणारी प्रगती हे होताना दिसत नाही. पण प्रक्रियेतील
प्रश्नांचे किंवा समस्यांचे भांडवल करून घटनेला भव्य-दिव्य रूप देण्याचा प्रयत्न
मात्र सतत होत असतो. कुठलेतरी एक शाब्दिक भूषण वापरुन घटनांचा इतका गाजावजा होतोय
की जणू ज्या प्रश्नासाठी किंवा समस्यासाठी हा खटाटोप सुरू आहे ते लगेच सुटलेच समजा.
ध्वणीप्रदूषण कमी व्हावे म्हणून बर्याच संस्था आणि लोक “हॉर्न
नको” चे माहितीफलक घेऊन चौका-चौकात दिसतात. हा सर्व प्रकार मोडतो एका विशिष्ट
घटनेमध्ये (Event) ज्याचा दीर्घकालीन उपयोग होईल किंवा वाहनचालक हॉर्न
वाजवणार नाही याची शक्यता खूपच कमी असते. कारण त्यामागची संपूर्ण लोकशिक्षणाची
प्रक्रिया ही पुरेशी नाही. सामान्य जनतेला साधे वाहतुकीचे नियम माहिती नसतात त्यामुळे
चुकीच्या पद्धतीने वाहन चालविणे आणि इतरांनी हॉर्न वाजविणे ही साखळी निरंतर चालूच
राहील जोपर्यंत आपण मूळ प्रश्नावर काम करणार नाही. याचप्रकारे प्रक्रिया डावलून
घटनांच्या मागे धावायची पद्धत आता सर्वच क्षेत्रात रूजली आहे. त्यामुळे विविध
कार्यक्रम, शिबिरे, यात्रा अश्या
प्रकारच्या घटनांचे आणि कार्यक्रमाचे आयोजन हे आता पूर्वीपेक्षा जास्त होताना
दिसते, आणि विशेषकरून युवावर्गातील एका मोठ्या घटकाचा कल हा
प्रक्रियेकडे नसून घटणे(Event) कडे आहे, कारण हा प्रसिद्धी मिळवायचा अगदी सोपा आणि सहज शक्य असणारा मार्ग आहे.
शहरे आणि गावे अशी वर्गवारी प्रस्थापित झाल्याने दिवसेंदिवस
गावखेड्यात उपजीविकेची साधने कमी होत चालली आहे. परिणामी लोकांचे शहराकडे स्थलांतर
मोठ्या प्रमाणात होत आहे. अश्या परिस्थितीमध्ये गावातच लोकांना रोजगार मिळेल या
हेतूने बर्याच संस्था आणि व्यक्ति काम करत असतात आणि ती एक लांबलचक प्रक्रिया
असते, अगदी एका रात्री मध्ये लोकांचा रोजगाराचा प्रश्न सुटत नसतो किंवा
रोजगारासाठी लागणारे कौशल्य अवगत होण्याकरिता एक कालावधी लागतो, आणि या संपूर्ण प्रक्रियेतून गेल्याशिवाय पुढे फार काही होऊ शकत नाही.
याउलट गावातील लोकांची अवस्था बघून काही लोक त्यांना सरळ एकदा वस्तूरूपात मदत
करतात, पण याप्रकारे एकदा केलेल्या मदतीच्या कार्यक्रमाने
प्रश्न सुटतो काय, तर बिलकुल नाही. अशीच काही अवस्था आहे ती
शेतकरी बांधवांची. शेतकरी शेतात राबून आपल्या सर्वांसाठी अन्न पिकवतो आणि त्या
अन्नाच्या आधारे आपण जीवंत असतो. ही अन्न पुरवून जगाचे भरणपोषन करण्याची एक मोठी
निरंतर प्रक्रिया कित्येक वर्षापासून सुरू आहे. पण एखाद्या रूग्णाला औषध देऊन जेव्हा
डॉक्टर त्याला ठीक करतो किंवा त्याचे प्राण वाचवतो तेव्हा डॉक्टर ला चक्क
देवासारखी वागणूक मिळत असते याउलट जो शेतकरी बांधव आपल्याला एका प्रक्रियेमार्फत
जिवंत ठेवतो त्याला सन्मानजनक वागणूक कधीच मिळत नाही. परिणामी शेतकरी दिवसेंदिवस
अश्या या आपण बनविलेल्या वर्गवारीने सामाजिक आणि आर्थिक खड्ड्यात खेचल्या जातोय.
एकदा प्राण वाचविणे किंवा सामुग्री पुरविणे ही एक घटना आहे आणि निरंतर रोजगार आणि
अन्न पुरविणे ही एक प्रक्रिया.
याच धर्तीवर सध्याचे सरकार काम करत आहे. मोठमोठ्या
घटना(Events), भरपूर जाहिरातबाजी, भपकेदार नाव यावरच जास्त भर दिल्या जातांना दिसतो आहे व घटना घडली म्हणजे
काम झालेच असा लोकांना समज द्यायची किंवा आभास करून देण्याची ही उत्तम प्रणाली
आहे. या सर्वांची सांगड घालून लोकांना आवश्यक असलेल्या प्रक्रियेपासून भरकवटायच
आणि विविध घटनामध्ये गुंतून ठेवायच व सरकार चालवायच हीच जणू यशाची गुरुकिल्ली झाली
आहे.
शेवटी काय तर, आनंदी आनंद गडे,
जिकडे तिकडे चोही कडे.
Comments
Post a Comment