Skip to main content

आरोग्यवारी

गेल्या आठवड्यात ३ दिवस काही कामानिमित्त मेळघाट आणि धारणी ला जाऊन आलो. त्यावेळी  नागपुरात आधीच कोरोनाचे ४ रुग्ण होते आणि सार्वजनिक ठिकाणे,कार्यक्रम बंद झाली होती. मोठं शहर असल्यामुळे नागपुरात बऱ्यापैकी लोकांमध्ये कोरोना या आजारबद्दल माहिती होती, काय करावे आणि काय करू नये याबद्दलची जागरूकता पण होती. त्यामुळे लोकं सावध पवित्रा घेऊन होते, शक्यतो बाहेर जायचे टाळत होते. पण मेळघाट किंवा धारणी मध्ये अशी परिस्तिथी नव्हती. लोकांना कोरोना नामक आजार आला आहे यापलीकडे आजाराबद्दल काहीच माहिती नव्हते. परिणामी घ्यावी ती काळजी घेतल्या जात नव्हती. त्यात भर म्हणजे इस्पितळ आणि औषधांची दुकाने हे बहुतेकदा मोठ्या खेड्यात आणि तालुकाच्या ठिकाणीच होते. बरीच गावे अशी होती जिथे साधा कच्चा रस्ता पण नव्हता मग बाकी सुविधां तर दूरची गोष्ट आहे. अश्या ठिकाणी जर एखाद्या कोरोनासारख्या साथीच्या रोगाची लागण झाली तर परिस्तिथी किती गंभीर आणि चिंताजनक होऊ शकते याचा अंदाज आपण लावू शकतो. शहरामध्ये आरोग्य सेवा, औषधे या सुविधा अगदी सहज उपलब्ध असतात, त्यामुळे रोगराईला आटोक्यात आणणे सहज शक्य असते. पण ग्रामीण भागात या सुविधांच्या अभावी रोगराई आटोक्यात आणणे हे काम युद्धपातळीचे होऊन बसेल.  सुविधांचा अभाव, जागरूकतेची कमी आणि कमी असलेले शिक्षण यांची उत्तम सांगड होऊन परिणामी रोगाला आटोक्यात आणणे अशक्यप्राय होईल. .

 

वर्गवारी बद्दल बोलताना बहुतेकदा आर्थिक आणि सामाजिक असमानतेणे झालेल्या वर्गवारीबद्दलच बोलले जाते. वर्गवारीच्या इतर अंगाबद्दल फार काही बोललं किंवा विचार केला जात नाही. इतर न विचार केलेल्या बाबीमधील महत्त्वाची बाब म्हणजे "आरोग्य"  त्यात भर म्हणजे  "सार्वजनिक आरोग्य". खाजगी आरोग्य सुविधेचा उपयोग करणे हे सर्वांच्या आवाक्यात नसते आणि परिणामी तिथे पण खाजगी आणि सार्वजनिक आरोग्य सुविधा अशी वर्गवारी दिसून येते.

आपल्या समाजात असा समज आहे कि सार्वजनिक आरोग्य सुविधा हि नेहमीच कुचकामी आणि अप्रभावी असते, त्यामुळे कधी कधी तर  फक्त आपल्या वर्गाला चिकटून राहता याव याच एका हेतूने आपण सार्वजनिक आरोग्य सुविधेचा उपयोग करत नाही. परिणामी खाजगी इस्पितळात जाणारे उच्च आणि श्रीमंत व सार्वजनिक इस्पितळात जाणारे हे गरीब आणि दुय्यम अशी वर्गवारी दिसून येते. हे तर झालं जिथे दोन्ही व्यवस्था अस्तित्वात आहे, पण भारतातल्या बऱ्याच मोठ्या भागात  मुख्यतः ग्रामीण भागात खाजगी तर सोडा पण सार्वजनिक आरोग्य व्यवस्था पण पुरेशी उपलब्ध नाही आहे. मोठ्या किंवा मध्यम आकाराच्या शहरात बरेच सार्वजनिक आणि खाजगी इस्पितळे दिसून येतात पण हीच परिस्थिती ग्रामीण भागात दिसून येत नाही. इस्पितळे तर सोडा पण औषधांच्या दुकानांचा पण ग्रामीण भागात तुटवडाच दिसून येतो.

 

शहरात आणि ग्रामीण भागात प्रति व्यक्तीमागे उपलब्ध असलेली इस्पितळ किंवा औषधांची दुकाने यात मोठी असमानता आहे, जी शहराकडे झुकलेली आहे. एकूण लोकसंख्येच्या जवळपास ६९-७०% लोकसंख्या हि ग्रामीण भागात वास्त्यव्यास आहे, पण त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधा या फक्त ३३-३५%  आहे. त्यामुळे बहुतेकदा एखाद्या शहरात राहणाऱ्या व्यक्तीच्या रोगाच्या निदानाला किंवा इलाजाला शहरात एक दिवस लागत असेल तर त्याच प्रक्रियेला एका ग्रामीण भागातील व्यक्तीसाठी दोन ते तीन दिवस लागू शकतात.  या विषम व्यवस्थेमागे कुठलीच अशी लगेच लक्षात येणारी बाब नाही आहे, पण बहुतेक ग्रामीण भागातील लोकांची क्रयशक्ती कमी असल्याने आणि आपली विकासाची दिशा वेगळी असल्याने आपल्या व्यवस्थेत त्यांना प्राधान्य दिले जात नाही. कारण आरोग्य सुविधा हा एक सर्वांचा सामान अधिकार राहिलेला नसून विकल्या जाणारी एक वस्तू किंवा आणि सेवा बनून बसलेली आहे.

 

इतक्या सगळ्या मोठ्या खाजगी कंपन्या आणि खाजगी इस्पितळे मात्र आपत्ती च्या वेळेस नेमके हात वर करून घेतात. प्रस्थापित वर्गवारीचा नफा कमवायचा वेळेस उपयोग करून घ्यायचा आणि मग सोडून द्यायचे. यास जबाबदार फक्त कंपनी किंवा इस्पितळ च नाही तर आपण सुद्धा आहेतच. आपण आपला वर्ग टिकून ठेवायला यांच्याकडे जातोच.  

Comments

Popular posts from this blog

अव-काळाचे आर्त : स्वातंत्र्य-सुरक्षिततेचा सवाल!

तुमच्या स्वत:च्या अपत्याचे नाव ठेवायची परवानगी तुम्हाला नसेल तर काय होईल? किंवा नेमकी पाच-सहा नावेच सर्वांना वाटून दिली, तर? किती लोकांची नावे समान असतील? सपाट समानतेचा हाच डिस्टोपियन धागा पकडून आयरा लेविन यांनी ‘धिस परफेक्ट डे’ ही कादंबरी गुंफलेली आहे. १९६९ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीला तत्कालीन शीतयुद्धाची पाश्र्वभूमी आहे. त्यात स्टालिनवादानुसार चालणाऱ्या एका, भविष्यातल्या विश्वरूपी व्यवस्थेची कल्पना केली आहे, त्या व्यवस्थेला ‘कुटुंब’ असे म्हटले जाते. त्या कुटुंबातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय मायबाप सरकार घेताना दिसते. ‘चिप’ नावाच्या एका पुरुषाच्या आयुष्याभोवती ही कादंबरी फिरते. शाळेच्या पटांगणात खेळणाऱ्या चिप आणि इतर मुलांच्या संभाषणांतून समाजातील लोक दोन भागांत विभागले गेल्याचे वाचकाला दिसते. ज्याप्रमाणे हल्ली आपण धर्म, जात, वर्ण, पक्ष, देश आणि इतर गोष्टींच्या आधारे ‘ते आणि आम्ही’ अशा विभागण्या सहजगत्या करतो, अगदी त्याचप्रमाणे कादंबरीमध्ये ‘रोगट आणि निरोगी’ अशी लोकांची विभागणी दिसते. जगातील काही व्यक्ती एका असाध्य रोगाने पछाडलेल्या आहेत, अशी कादंबरीतली ...

अव-काळाचे आर्त : चंगळवादाचे थैमान…

संपूर्ण जग विकून हडप केलेल्या समाजाचे पाय कोणत्या दिशेने जाऊ शकतात, याचे विवेचन मांडण्याचा प्रयत्न म्हणजे- ‘द स्पेस मर्चंट्स’! पृथ्वी आणि पृथ्वीवरील संपूर्ण संसाधने ही फक्त मानवाच्या उपभोगासाठीच आहेत असा समज असलेल्या आणि नीतिमत्तेची चाड न बाळगणाऱ्या समाजाचे विवरण लेखकाने ‘द स्पेस मर्चंट्स’मध्ये केले आहे. या कादंबरीचा नायक एका मोठ्या जाहिरात कंपनीमध्ये उच्चपदस्थ आहे. सकाळी उठल्यापासून ज्या-ज्या वस्तूंचा किंवा संसाधनांचा उपभोग मनुष्य घेतो, ती-ती वस्तू वा संसाधन जास्तीत जास्त लोकांना विकण्याचे काम ही जाहिरात कंपनी करत असते. फ्रेडरिक पोल आणि सीरील कॉर्नब्लथ लिखित, १९५३ साली प्रथम प्रकाशित झालेल्या, ‘द स्पेस मर्चंट्स’ या कादंबरीमध्ये चंगळवादामुळे निर्माण झालेल्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीचे वर्णन करण्यात आले आहे. पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधने जवळपास संपुष्टात आल्याने उपभोगासाठी नवीन संसाधने मिळावीत या हेतूने सूर्यमालेतील इतर ग्रहांच्या शोधात विविध देशांतील सरकारे आणि संलग्न कंपन्या यांमध्ये स्पर्धा सुरू असते. या स्पर्धेच्या अवतीभोवती ही कादंबरी गुंफलेली आहे. कादंबरीचा नायक म्हणजेच मिच कोर्टेने...

सेंद्रिय अन्न: काळाची गरज

 गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, सुरक्षित अन्न या चळवळींनी शेतकरी-ग्राहकांमध्ये शेती आणि अन्नप्रणाली बद्दल मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण केली आहे. अगदी दहा वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजेच २०१२-१३ साली कच्च्या घाणीच्या तेलाचा किंवा सेंद्रिय शेतमालाचा साधा कुठे उल्लेख पण होत नव्हता आणि आज नागपूर मध्ये आपल्याला ठिकठिकाणी कच्च्या घाणीच्या तेलाचे आणि सेंद्रिय शेतमालाचे दुकान दिसायला लागले आहे. बाजारभावापेक्षा थोडा महाग असून सुद्धा लोकांचा कल या उत्पादनांकडे वाढतांना दिसतो आहे. मानवी आणि एकंदर पृथ्वीच्या आरोग्याचा विचार केला तर सध्याची आपली वाटचाल हि बरीच आशादायी आहे.   याच काळात कर्करोग, मधुमेह आणि इतर रोगांचा सुळसुळाट पण भरपूर वाढलेला दिसतो आहे. काही वर्षांपूर्वी कर्करोग व मधुमेह हे श्रीमंत आणि शहरी लोकांचे आजार समजले जायचे. आज परिस्थिती अशी आहे की कर्करोगाच्या निदानात फार नाविन्य राहिलेलं नाही आणि मधुमेह तर आज सर्वसामान्य होऊन बसला आहे. आज या रोगांची विभागणी शहरी किंवा ग्रामीण अशी होऊ शकत नाही. आपल्या आहारात वाढलेल्या साखर, मीठ आणि चरबीच्या प्रमाणामुळे व ...