Skip to main content

हिटलर येता घरी

इयत्ता पहिली आणि दुसरी मध्ये असताना मला घरून पैशे चोरायची वाईट सवय लागली होती. पैशांच्या नोटा चोरून मी शालेय पुस्तकांमध्ये ठेवत असे. तेव्हा माझा समज असा होता की पुस्तकांमध्ये पैशे ठेवल्याने दुप्पट होतात. याचप्रमाणे मी नाणे चोरून घराजवळच्या एका विहिरीत टाकायचो, कारण पुन्हा तेच की नाणी दुप्पट होऊन वर येतात. माझ्या चोरीच्या सवयीबद्दल जेव्हा घरी कळाले तेव्हा मला भरपूर चोप बसला आणि मला जवळपास मध्यरात्रीच्या समोरपर्यंत बाहेर ठेवण्यात आले होते. हे सर्व घडलं हिवाळ्यात व नागपूरमध्ये हिवाळ्यात बर्‍यापैकी थंडी असते. एक जमेची बाब होती ती म्हणजे मी त्या चोरलेल्या पैशांचा गैरवापर करत नव्हतो. त्यांचा वापर मी कधीच वाम मार्गी लागण्यासाठी पण केला नाही. घरच्यांनी चोप दिल्यामुळे किंवा स्वतःची चूक समजल्याने म्हणा त्यानंतर माझी चोरी करण्याची सवय मात्र तुटली. पण घरच्यांनी म्हणजेच माझ्या आई-बाबांनी प्रेमापोटी जर मला चोप दिला नसता किंवा जाब विचारला नसता आणि आपलाच मुलगा आहे म्हणून सोडून दिलं असतं तर कदाचित माझा चोरी करण्याचा आत्मविश्वास आणखी वाढला असता आणि समोर जाऊन मी एखादा मोठा चोर किंवा दरोडेखोर होऊ शकलो असतो. अर्थातच असे काही घडले नाही आणि याचे पूर्ण श्रेय जाते ते म्हणजे माझ्या आई-बाबांना. पुत्रप्रेमाला बळी न पडता त्यांनी मी केलेल्या चुकांची सावरासावर केली नाही व योग्य तो निर्णय घेतला आणि माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. पण झालेल्या चुकीच्या गोष्टीला चूक म्हणून स्वीकारण्याची आणि त्याला सुधारण्याची किती लोकं हिम्मत दाखवतात, याचे समाजातील प्रमाण पडताळून बघितले तर ते नक्कीच कमी मिळेल.

 

आपल्या अवतीभवती बरीच अशी उदाहरणे दिसतील जिथे आई-बाबांच्या प्रेमापोटी चुकलेल्या निर्णयामुळे त्यांच्या मुलांचे आयुष्य मातीत गेले. कुठलाही मोठा हुकूमशहा, गुन्हेगार, गुंड, आतंकवादी किंवा निरंकुश व्यक्तिमत्त्व असलेला/ली व्यक्ति ही जन्मजात असंवेदनशील नसते पण ती त्याप्रकारे घडत जाते आणि बर्‍याचदा ती व्यक्ति आप्तजनांनी योग्य वेळेवर जाब न विचारल्याने किंवा चुकीच्या गोष्टीला चूक म्हणून स्वीकार न केल्याने पुढे अंगवळणी पडत जाते. हुकूमशहा हा विषय निघाला की आपल्याला फक्त हिटलर आणि वर्तमान काळातील काही देशांचे राज्यकर्तेच दिसतात पण दररोजच्या जीवनातील उदाहरनांच काय ? हे सर्व हुकूमशहा अगदी लहानपनापासूनच असे नसणार, यांनी वारंवार केलेल्या चुकांना कानाडोळा झालेला असेल. आपले त्या व्यक्तीशी संबंध खराब होऊ नये किंवा प्रेमापोटी त्यांच्या पालकांनी, भावंडांनी आणि समोर जाऊन मित्रपरिवाराने कधीच त्यांना जाब विचारलेला नसेल. परिणामी, त्यांचा आत्मविश्वास वाढून ते या पातळीवर पोहचू शकले. हिटलर, ट्रंप, मोदी यांनी केलेल्या चुकांबद्दल आपण नेहमीच बोलत असतो पण हेच आपण आपल्या जवळच्या व्यक्तींबाबत करत नाही. तेव्हा आपली नीती आणि मूल्ये ही मुद्दाम डावलली जातात.

तथाकथित सामाजिक क्षेत्रात काम करत असल्याने याप्रकरचे अनुभव अगदी जवळून बघायला मिळतात.   लोकांशी आणि प्रसिद्धी माध्यमांशी बोलत असताना जवळपास सगळेच नीती आणि मूल्यांचा डोंगर उभारतात. परंतू याच नीती-मूल्यांचा मात्र स्वतःच जीवनातील निर्णयप्रक्रियेत फार काही वाटा दिसत नाही. हिटलर सारखी पातळी गाठल्यानंतर त्याच्यावर ताशेरे ओढून फार काही उपयोग होत नाही. वेळोवेळी आपल्यासोबत किंवा आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या अन्यायाबद्दल आणि चुकांबद्दल बोलल्याने एखादा हिटलर इन मेकिंग(Hitler in making) मात्र नक्कीच दुसरी वाट घेईल.

परंतू, हे करणे आपल्याला शक्य आहे का आणि ते करण्यासाठी आपल्या पाठीत कणा उरला आहे काय  ?

आपला मित्र नेहमी मुलींना काही तरी अभद्र बोलतो पण आपण मैत्रीखातर त्याला काही म्हणत नाही. कुठलीतरी मोठी व्यक्ति काही तरी चुकीच करते तेव्हा आपण काही करत नाही कारण आपल्याला समोर जाऊन त्या व्यक्तीची गरज भासू शकते. आपले गुरु(idol/mentor) बोलतात एक आणि करतात एक पण आपण गप्प असतो कारण ते आपले गुरु असतात. आपला बॉस किंवा वरिष्ठ कुठल्यातरी विशिष्ट व्यक्तिला मजा म्हणून नेहमी त्रास देत असतो पण आपल्याला बढती हवी असते म्हणून आपण पुन्हा गप्प असतो. अशी अनेक उदाहरणे बघायला मिळतील जेव्हा आपण आपल्या क्षुल्लक-क्षुल्लक फायद्यांसाठी सत्य आणि न्यायाची बाजू न घेता अन्यायाची बाजू घेतो आणि आपण स्वतः एका असंवेदनशील हुकूमशहाला जन्म घालतो. म्हणूनच वेळोवेळी सत्याची बाजू घेऊन उभे राहणे त्याबद्दल बोलणे हे आपल्यासाठी आणि संपूर्ण समाजासाठी आवश्यक असते. संत तुकाराम म्हणूनच गेले आहेत

 

       “ राजयाचा पुत्र अपराधी देखा, परीका तो कोना दंडवेल.”

Comments

Popular posts from this blog

सेंद्रिय अन्न: काळाची गरज

 गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, सुरक्षित अन्न या चळवळींनी शेतकरी-ग्राहकांमध्ये शेती आणि अन्नप्रणाली बद्दल मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण केली आहे. अगदी दहा वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजेच २०१२-१३ साली कच्च्या घाणीच्या तेलाचा किंवा सेंद्रिय शेतमालाचा साधा कुठे उल्लेख पण होत नव्हता आणि आज नागपूर मध्ये आपल्याला ठिकठिकाणी कच्च्या घाणीच्या तेलाचे आणि सेंद्रिय शेतमालाचे दुकान दिसायला लागले आहे. बाजारभावापेक्षा थोडा महाग असून सुद्धा लोकांचा कल या उत्पादनांकडे वाढतांना दिसतो आहे. मानवी आणि एकंदर पृथ्वीच्या आरोग्याचा विचार केला तर सध्याची आपली वाटचाल हि बरीच आशादायी आहे.   याच काळात कर्करोग, मधुमेह आणि इतर रोगांचा सुळसुळाट पण भरपूर वाढलेला दिसतो आहे. काही वर्षांपूर्वी कर्करोग व मधुमेह हे श्रीमंत आणि शहरी लोकांचे आजार समजले जायचे. आज परिस्थिती अशी आहे की कर्करोगाच्या निदानात फार नाविन्य राहिलेलं नाही आणि मधुमेह तर आज सर्वसामान्य होऊन बसला आहे. आज या रोगांची विभागणी शहरी किंवा ग्रामीण अशी होऊ शकत नाही. आपल्या आहारात वाढलेल्या साखर, मीठ आणि चरबीच्या प्रमाणामुळे व ...

"As A Country, We Need To Switch From Reactive To Proactive Ways Of Dealing With Issues Of National, Global Importance"

Last week, I spoke to a friend about the ongoing pandemic scenario and how most of our friends support people who need help. During this whole conversation, the thing which hit me the most was, she said, "Yaar, there was a lockdown and pandemic last year too, but it didn't affect me much the way this lockdown or the pandemic is affecting." This is because so many people are going through misery. So many people are dying due to lack of one or another thing. I replied immediately that "Last year, we were too involved in playing Ludo, making dalgona coffee, sharing stupid videos to realize that 30 Million people were walking towards their home without any help from the state or any institution and fellow countrymen." Many of us believe in Karma. If you do something good to someone, it will come back to you in one form or another. But, unfortunately, I think the same is happening with us. The kind ignorance we showed towards all the people walking back to their home...

वाघ एके वाघ.

बाबाराव , गेल्या ४ - ५ वर्षांपासून २मुख्य समस्यांनी ग्रासलेले आहे . पहिली समस्या म्हणजे जंगली जनावरांचा वाढत त्रास आणि दुसरी म्हणजे नाईलाजाने / बळजबरीने करावे लागणारे स्थलांतर . बाबाराव वर्धा जिल्यातील बोर जंगलाजवळ आमगाव जंगली या गावात गेल्या कित्येक पिढ्यांपासून वास्तव्यास आहे . नंदा गवळी या समाजाचे असल्याने गायी - म्हशी पाळणे हा त्यांचा पारंपरिक आणि मुख्य व्यवसाय . गावालगतच कुरण आणि जंगल यावर गाई - म्हशी साठी लागणाऱ्या चाऱ्याची मदार . त्यामुळे जंगलात गावातील लोकांचा आणि पशूंचा नेहमीच वावर असायचा . जंगलाचे संवर्धन हे गावपातळीवर सामूहिकरत्या व्हायचे . तेव्हापण जंगलात वाघ आणि इतर पशु होतेच , त्यांचा जन्म काही आता आरक्षित जंगल घोषित झाल्यानंतर नाही झाला . तरीपण याआधी बाबारावला   अश्या प्रकारची निसर्गाची किंवा नैसर्गिक साधनसंपत्तीची वर्गवारी कधीच आढळली नाही . सध्यस्थितीत जंगल आणि वाघाच्या संवर्धनाच्या नावाखाली जो काही घोळ सुरु आहे यावर बाबाराव ला हसावे कि रडावे हेच ...