Skip to main content

शेती विना माती.


गेल्या एक महिन्यापासुन इतर देशाप्रमाणे आपल्या देशात सुद्धा कोरोना नामक रोगाने थैमान घातला आहे. रोगाचा प्रसार रोखण्याकरिता संपूर्ण देशात २४ मार्च पासून संचारबंदी(लॉकडाऊन) लागू करण्यात आली. एकूणच संचारबंदी हि समाजातील सर्व घटकांचा विचार न करता केल्यामुळे बऱ्याच लोकांची वाताहत होताना आपण गेल्या १ महिन्यापासून बघतोय. देशभरात मजूर लोकांची दयनीय अवस्था झालेली आहे. स्थलांतरित कामाच्या ठिकाणी काम आणि परिणामी जगण्याकरिता लागणारा पैसा उपलब्ध नसल्याने त्यांच्याकडे मूळ गावी जाणे हाच एकमेव पर्याय उपलब्ध होता. पण दळणवळणाची कुठलीच साधने उपलब्ध नसल्याने मोठा मजूर वर्ग हा चालत चालत समोर निघून गेला. साधने आणि दुकानाच्या अनुपस्थितीमुळे या लोकांना खायला काही मिळत नव्हते आणि इतक्या मोठ्या संख्येत असलेल्या लोकांची वेगवेगळ्या ठिकाणी सोय करणे हे सुरुवातील सरकारी यंत्रणेला झेपण्यासारखे पण नव्हते. अश्या या अवस्थेमध्ये समाजातील बऱ्याच लोकांनी आणि विविध संस्थांनी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त लोकांना  पुरेपूर अन्न पुरवण्याचा प्रयत्न केला गेला, आणि हे प्रयत्न खरोखरच प्रशंसनीय आहे.

 

 

या सर्व घटनाक्रमातुन एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे  इतक्या मोठ्या लोकसंख्येत मजूर वर्ग हा गाव सोडून शहराकडे स्थलांतर का करत आहे ? गावाकडे उपजीविकेची साधन आणि काम उपलब्ध नसल्याने किंवा शहरी जीवनशैलीच्या आकर्षणाने ? तर बहुसंख्य लोकांचे उत्तर असेल ते म्हणजे दिवसेंदिवस गावाकडील कमी होत असलेली उपजीविकेची साधने. भारतातील एकूण लोकसंख्येच्या ६६% लोकांचे वास्त्यव्य हे ग्रामीण भागात आहे आणि जवळपास ४३% लोकसंख्या हि उपजिविकेकरिता शेतीवर अवलंबून आहे. हा आकडा २००८ साली ५३% इतका होता. म्हणजे गेल्या १०-११ वर्षात शेतीक्षेत्रातील १०% रोजगार हा नाहीसा झाला.परीणामी लोकांचे शहराकडे स्थलांतर, मिळेल ते काम करणे, झोपडपट्ट्यात वाढ, उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनावर ताण असे न थांबणारे  दुष्ट चक्र सुरु होते आणि कोरोना सारख्या अन्य कुठल्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस आज बघायला मिळत आहे तशी अवस्था होऊन बसते. १९७५ साली सोन्याचा भाव हा रुपये ४०० प्रति १० ग्राम इतका होता आणि तो आज रुपये ४२,००० इतका आहे म्हणजे १०५ पट वाढ , आणि कापसाचा भाव रुपये ५०० प्रति क्विंटल आणि आज तो भाव ५१०० इतका आहे म्हणजे फक्त १० पट वाढ. अश्या या भावातील वाढत्या दरीमुळे शेतीव्यवस्था कशी सुधारणार ?

 

 

थोड्या वेळेसाठी जर आपण विचार केला कि गावातून इतके स्थलांतर झालेच नाही आणि गावातच उपजीविकेचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. तर अश्या स्तिथीत आता जी परिस्थिती मजूर लोकांची आहे ती कदाचित नसती. ते आपापल्या घरी आणि गावी खुश असते, पण प्रत्यक्षात तसे नाही आहे कारण आपली शेतीव्यवस्था हि कोलमडली आहे आणि  ती आणखी कोलमडत जात आहे. वेळेत तिला रुळावर आणण्याची काळाची गरज होऊन बसली आहे आणि यासाठी समाजातील सर्व घटकांनी प्रयत्न घेणे खूप गरजेचे आहे.

 

बऱ्याच लोकांचा हा समज होऊन बसला आहे कि हि तर सरकारची जबाबदारी आहे, त्यात सामान्य नागरिक काय करणार आणि त्यामुळे आमच्या जीवनात फार फरक सुद्धा पडत नाही मग आम्ही का विचार करावा वगैरे वगैरे. उदाहरणार्थ नागपूर हे एक शहर आहे आणि या शहरात १ लक्ष लोकांना आरामात पुरेल इतके नैसर्गिक साधने (मोकळी जागा,रस्ते, स्वच्छ हवा आणि पाणी, शाळा, दवाखाने, वगैरे)  आहेत. आता अश्या परिस्थितीत जर जवळ असलेल्या वर्धा जिल्ह्यातील एका गावाची शेतीव्यवस्था कोलमडली आणि त्या गावातले ५०० लोक नागपूर ला राहायला आले तर उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनावर ताण  येईल आणि त्यामुळे पाण्याची टंचाई,प्रदूषण, गर्दी, अवैध घरकुल अश्या प्रकारचे सामाजिक प्रश्न निर्माण होतील आणि याचा परिणाम साहजिकच नागपूर मध्ये राहणाऱ्या १ लक्ष लोकांच्या जीवनावर होईल. दुसरे उदाहरण: समजा नागपूर मध्ये एक ट्रॅक्टर चा कारखाना आहे ज्यात ५००० कामगार काम करतात. या कारखान्यातील बहुतांश ट्रॅक्टर हे विदर्भात विकल्या जातात.अश्या परिस्थितीत जर शेती बुडाली तर ट्रॅक्टर चा खप कमी होईल, साहजिकच कामगारांची छाटणी किंवा पगारात कपात होईल. कामगारांची क्रयशक्ती कमी झाल्याने साहजिकच इतर वस्तूंची मागणी कमी होईल आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेला याचा फटका हळू हळू बसेल. तिसरे उदाहरण: कोरोनासारख्या आपत्तीच्या वेळी सामान्य नागरिकांना स्वखर्चातून आणि स्वपरिश्रमातून इतका खटाटोप करण्याची गरज नसती पडली. हि तर अगदी सहज दिसून येणारी ३ उदाहरणे आहेत पण शेती व्यवस्था कोलमडल्यावर विविध आर्थिक आणि सामाजिक प्रश्न जन्म घेतात, त्यामुळे शेतकरी हे वेगळे आणि आम्ही शहरात राहणारे अथवा शेती न करणारे हे वेगळे अशी हि वर्गवारी समाजात काय बदल घासून अनु शकते हे वेगळे सांगायची गरज नाही आहे त्यामुळे एकूणच शेती व्यवस्था जागेवर आणणे हे संपूर्ण समाजाच्या हिताचे आहे.

Comments

Popular posts from this blog

सेंद्रिय अन्न: काळाची गरज

 गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, सुरक्षित अन्न या चळवळींनी शेतकरी-ग्राहकांमध्ये शेती आणि अन्नप्रणाली बद्दल मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण केली आहे. अगदी दहा वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजेच २०१२-१३ साली कच्च्या घाणीच्या तेलाचा किंवा सेंद्रिय शेतमालाचा साधा कुठे उल्लेख पण होत नव्हता आणि आज नागपूर मध्ये आपल्याला ठिकठिकाणी कच्च्या घाणीच्या तेलाचे आणि सेंद्रिय शेतमालाचे दुकान दिसायला लागले आहे. बाजारभावापेक्षा थोडा महाग असून सुद्धा लोकांचा कल या उत्पादनांकडे वाढतांना दिसतो आहे. मानवी आणि एकंदर पृथ्वीच्या आरोग्याचा विचार केला तर सध्याची आपली वाटचाल हि बरीच आशादायी आहे.   याच काळात कर्करोग, मधुमेह आणि इतर रोगांचा सुळसुळाट पण भरपूर वाढलेला दिसतो आहे. काही वर्षांपूर्वी कर्करोग व मधुमेह हे श्रीमंत आणि शहरी लोकांचे आजार समजले जायचे. आज परिस्थिती अशी आहे की कर्करोगाच्या निदानात फार नाविन्य राहिलेलं नाही आणि मधुमेह तर आज सर्वसामान्य होऊन बसला आहे. आज या रोगांची विभागणी शहरी किंवा ग्रामीण अशी होऊ शकत नाही. आपल्या आहारात वाढलेल्या साखर, मीठ आणि चरबीच्या प्रमाणामुळे व ...

अहोभाग्य

आपला समाज हा असंख्य अश्या विविध वर्गांमधे आणि तुकड्यांमधे विभागलेला आहे . गेल्या १८ स्तंभातून आपण समाजात अस्तीत्वात असलेल्या वेगवेगळ्या वर्गवार्‍यांवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण ज्या वर्गात मोडतो त्याचे काही फायदे व काही तोटेसुद्धा असतातच. या फायद्या आणि तोट्याचे प्रमाण हे आपण कुठल्या वर्गात मोडतो त्याच्यानुसार नेहमी बदलत असते. काही फायदे आणि तोटे हे निव्वळ आपण कुठल्या धर्मात आणि जातीत जन्म घेतला आहे यावर अवलंबून असतात व त्यात आपण फार बदल करू शकत नाही. याचप्रमाणे आपण कुठे राहतो ( शहर किंवा गाव ), आपल्या आजूबाजूला असलेल्या सोयी-सुविधा , आपल्या घरी असलेली शिक्षणाची परंपरा अश्या अनेक मोजता न येणार्‍या बाबीं आपल्या जीवनातील फायदे आणि तोटे ठरवत असतात. यापैकी कुठलीच परिस्थिति ही आपण स्वइच्छेने निवडलेली नसते. आपल्या परिसरातील सोयी-सुविधा सोडल्या तर बाकी सर्वच बाबी या आपल्याला जन्मजात मिळालेल्या असतात. नशीब बलवत्तर असल्यास आयुष्यभर तुम्हाला फायदे होत राहणार नाहीतर बाकी वर्गवार्‍यांसोबत या वर्गवारीला सामोरे जावे लागेल हे नक्की. एखाद्या व्यक्तीचे मूल्यमापन होत असतांना किंवा ए...

अव-काळाचे आर्त : स्वातंत्र्य-सुरक्षिततेचा सवाल!

तुमच्या स्वत:च्या अपत्याचे नाव ठेवायची परवानगी तुम्हाला नसेल तर काय होईल? किंवा नेमकी पाच-सहा नावेच सर्वांना वाटून दिली, तर? किती लोकांची नावे समान असतील? सपाट समानतेचा हाच डिस्टोपियन धागा पकडून आयरा लेविन यांनी ‘धिस परफेक्ट डे’ ही कादंबरी गुंफलेली आहे. १९६९ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीला तत्कालीन शीतयुद्धाची पाश्र्वभूमी आहे. त्यात स्टालिनवादानुसार चालणाऱ्या एका, भविष्यातल्या विश्वरूपी व्यवस्थेची कल्पना केली आहे, त्या व्यवस्थेला ‘कुटुंब’ असे म्हटले जाते. त्या कुटुंबातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय मायबाप सरकार घेताना दिसते. ‘चिप’ नावाच्या एका पुरुषाच्या आयुष्याभोवती ही कादंबरी फिरते. शाळेच्या पटांगणात खेळणाऱ्या चिप आणि इतर मुलांच्या संभाषणांतून समाजातील लोक दोन भागांत विभागले गेल्याचे वाचकाला दिसते. ज्याप्रमाणे हल्ली आपण धर्म, जात, वर्ण, पक्ष, देश आणि इतर गोष्टींच्या आधारे ‘ते आणि आम्ही’ अशा विभागण्या सहजगत्या करतो, अगदी त्याचप्रमाणे कादंबरीमध्ये ‘रोगट आणि निरोगी’ अशी लोकांची विभागणी दिसते. जगातील काही व्यक्ती एका असाध्य रोगाने पछाडलेल्या आहेत, अशी कादंबरीतली ...