Skip to main content

शेती सात्विकतेची !

भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपली परिस्थिती अन्न सुरक्षतेच्या बाबतीती जेमतेम होती. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अन्न सुरक्षा म्हणजे सर्वाना चांगल्या दर्जाच्या अन्नाचा शाश्वत १२ महिने, वेळेवर आणि पुरेसा पुरवठा. एकूणच पुरेसा अन्नाचा साठा नसताना बफर साठा(अन्न -धान्याचा) जमा करण्याचा प्रश्नच येत नाही किंवा पुरेसे अन्न-धान्याचे उत्पादन नसल्याने बफर साठा पण असायला हवा हा विचारच क्षुल्लक होता. प्रत्येक देश हा अन्न -धान्याचा बफर साठा साठवून ठेवत असतो. नैसर्गिक आपत्तीच्या काळात (ओला किंवा कोरडा दुष्काळ, भूकंप इत्यादी) हा साठा उपयोगात आणला जातो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच १०-१५ वर्षांनी साठी च्या दशकात आपल्यावर उपासमारीची पाळी आली. भारतासारख्या कृषीप्रधान देशात जिथे जवळपास ७०-७५% लोकसंख्या उपजिवीकेसाठी शेती वर अवलंबून होती तिथे अशी परिस्थिती हि एक चिंतेची बाब होती.परिणामी आपल्याला अमेरिकेसमोर अन्नासाठी भीक मागावी लागली होती कारण तेव्हा आपला भारत देश हा अन्ना-धान्याबाबत स्वालंबी नव्हता. अश्या या परिस्थितीवर मात करण्याकरिता डॉ स्वामिनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक शेती मध्ये काही बदल करून उत्पादन वाढीकरिता भारतात हरित क्रांती घडवून आणण्यात आली. जास्त उत्पादन देणारे बियाणे, उत्पादन वाढवणाऱ्या पद्धतीचा उपयोग, सिंचनाच्या उत्तम सोयी, कीटकनाशके , रासायनिक खते, सुधारित यंत्रे अश्या विविध गोष्टींची उत्तम सांगड घालून हि हरित क्रांती घडून आली. हरित क्रांतीच्या प्रसार भारतात होत गेला आणि भारत हळू हळू अन्न-धान्याबद्दल स्वालंबी झाला.

 

जवळपास ५० कोटी जनतेचे पोट भरण्याकरिता शेतीमध्ये आमूलाग्र बदलाची गरज होती आणि हरित क्रांती ने ते साध्य करून दाखविल. पण यानंतर भरगोस उत्पादन घेण्याकरिता रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा  प्रमाणाच्या बाहेर उपयोग करण्यात आला परिणामी जमिनीचा पोत जाणे, पाणी रसायनयुक्त होणे, भूजल पाण्याची पातळी खाली जाणे वगैरे समस्या निर्माण व्हायला लागल्या सोबतच अश्या या गहण शेती करण्याच्या पद्धतीने पिकणारे अन्न कितपत सुरक्षीत आहे याबद्दल प्रश्न निर्माण होऊ लागले. आणि या प्रश्नांना उत्तर म्हणून बऱ्याच लोकांनी शेतीच्या वेगवेगळ्या शाश्वत पद्धतीचा अवलंब करायला सुरुवात केली ज्यात एकूण उत्पादनाला महत्व न देता निसर्ग आणि निसर्गाच्या आणि विज्ञानाच्या नियमांना मध्यभागी ठेऊन शेती केली जाते.

 

नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, अध्यात्मिक शेती वगैरे असे विविध प्रकार यामध्ये दिसून येतात. या नमूद केलेल्या दोन-तीन आणि इतर पद्धतीमध्ये पण निसर्ग मध्यभागी असल्याने शेती पद्धती हि बऱ्यापैकी सारखीच आहे काही छोट्या गोष्टींचा अपवाद वगळता. माणव जसजसा उत्क्रांत होत गेला तसतशी पिढ्यादरपिढ्या  शेतीपद्धतीमध्ये मध्ये सुधारणा होत गेली, आणि हि सुधारणा सामाजिक समूहामार्फत होत गेली त्यामुळे कुठली तरी पद्धती एका व्यक्तीच्या मालकी हक्काची आहे असे होत नाही. पण हे इथेच थांबत नाही तर आमचीच शेती पद्धती कशाप्रकारे श्रेष्ठ आहे हे छाती ठोकून सांगने हेच प्रत्यकक्षात शेती करण्यापेक्षा जास्त दिसून येते, आणि इथे वेगवेगळ्या शेतकऱ्यांची वेगवेगळ्या वर्गात विभागणी केल्या जाते अथवा ती आपोआप होऊन जाते. आपल्या देशातला शेतकरी हा बऱ्यापैकी शिक्षणापासून दूर राहिलेला आहे त्यामुळे त्यांना सरकारी यंत्रणा किंवा कृषी केंद्रातुन जी माहिती मिळते त्या आधारित त्यांची शेती सुरु असते व उत्पादन वाढीवर जोर दिला जातो. यासगळ्या प्रकारात  जमीन खराब होत आहे किंवा निसर्गाची हानी होत आहे याबद्दल  विचार करायला त्याला सवड सुद्धा मिळत नाही आणि यात त्याचा पण दोष नाही आहे. प्रत्येक माणसाला त्याचा परीने त्याला जे जमेल आणि जे त्याचा आवाक्यात असेल ते तो करत असतो .

 

नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेतीकडे वळायचं म्हंटल तर सुरवातीचे २-३ वर्ष हे कमी उत्पादनाचे भोगावे लागतात आणि हे २-३ वर्ष सर्वच पेलू शकतात असे नाही. अल्पभूधारक शेतकऱ्याचे एका हंगामाचे पीक गेले तर त्याच्यावर जणू आभाळ कोसळल्यासारखे होते आणि त्याचा अस्तित्वाचा प्रश्न येऊन ठाकतो त्यामुळे आपण रासायनिक शेती करणारे किती लबाड आणि नफेखोर याप्रकारे हिणवत गेलो व आम्ही सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेती करणारे किती नीतिमान व निसर्गाचे मूल्य जपणारे आहोत हा  केवळ बालिशपणा आहे. आधीच सुरक्षित अन्नाचा प्रश्न हा ऐरणीवर येऊन बसला आहे आणि त्यात जर आपण अशी वर्गवारी करायला लागलो तर किती नवीन शेतकरी सुरक्षित रसायनमुक्त अन्नासाठी सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीचा अवलंबन करेल ? तर कदाचित खूप कमी. माझ्यासाठी जरी हा नीती आणि मूल्यांचा खेळ असला तरी काही लोकांनसाठी हा जीवन मरणाचा प्रश्न असतो.

 

त्यामुळे न हिणवता व नवीन वर्ग न बनावता सकारात्मकपणे शेतकऱ्यांना अन्न आणि निसर्गाबद्दल समजावून सांगणे हे नेहमीच प्रभावी ठरेल.   

Comments

Popular posts from this blog

सेंद्रिय अन्न: काळाची गरज

 गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, सुरक्षित अन्न या चळवळींनी शेतकरी-ग्राहकांमध्ये शेती आणि अन्नप्रणाली बद्दल मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण केली आहे. अगदी दहा वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजेच २०१२-१३ साली कच्च्या घाणीच्या तेलाचा किंवा सेंद्रिय शेतमालाचा साधा कुठे उल्लेख पण होत नव्हता आणि आज नागपूर मध्ये आपल्याला ठिकठिकाणी कच्च्या घाणीच्या तेलाचे आणि सेंद्रिय शेतमालाचे दुकान दिसायला लागले आहे. बाजारभावापेक्षा थोडा महाग असून सुद्धा लोकांचा कल या उत्पादनांकडे वाढतांना दिसतो आहे. मानवी आणि एकंदर पृथ्वीच्या आरोग्याचा विचार केला तर सध्याची आपली वाटचाल हि बरीच आशादायी आहे.   याच काळात कर्करोग, मधुमेह आणि इतर रोगांचा सुळसुळाट पण भरपूर वाढलेला दिसतो आहे. काही वर्षांपूर्वी कर्करोग व मधुमेह हे श्रीमंत आणि शहरी लोकांचे आजार समजले जायचे. आज परिस्थिती अशी आहे की कर्करोगाच्या निदानात फार नाविन्य राहिलेलं नाही आणि मधुमेह तर आज सर्वसामान्य होऊन बसला आहे. आज या रोगांची विभागणी शहरी किंवा ग्रामीण अशी होऊ शकत नाही. आपल्या आहारात वाढलेल्या साखर, मीठ आणि चरबीच्या प्रमाणामुळे व ...

अहोभाग्य

आपला समाज हा असंख्य अश्या विविध वर्गांमधे आणि तुकड्यांमधे विभागलेला आहे . गेल्या १८ स्तंभातून आपण समाजात अस्तीत्वात असलेल्या वेगवेगळ्या वर्गवार्‍यांवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण ज्या वर्गात मोडतो त्याचे काही फायदे व काही तोटेसुद्धा असतातच. या फायद्या आणि तोट्याचे प्रमाण हे आपण कुठल्या वर्गात मोडतो त्याच्यानुसार नेहमी बदलत असते. काही फायदे आणि तोटे हे निव्वळ आपण कुठल्या धर्मात आणि जातीत जन्म घेतला आहे यावर अवलंबून असतात व त्यात आपण फार बदल करू शकत नाही. याचप्रमाणे आपण कुठे राहतो ( शहर किंवा गाव ), आपल्या आजूबाजूला असलेल्या सोयी-सुविधा , आपल्या घरी असलेली शिक्षणाची परंपरा अश्या अनेक मोजता न येणार्‍या बाबीं आपल्या जीवनातील फायदे आणि तोटे ठरवत असतात. यापैकी कुठलीच परिस्थिति ही आपण स्वइच्छेने निवडलेली नसते. आपल्या परिसरातील सोयी-सुविधा सोडल्या तर बाकी सर्वच बाबी या आपल्याला जन्मजात मिळालेल्या असतात. नशीब बलवत्तर असल्यास आयुष्यभर तुम्हाला फायदे होत राहणार नाहीतर बाकी वर्गवार्‍यांसोबत या वर्गवारीला सामोरे जावे लागेल हे नक्की. एखाद्या व्यक्तीचे मूल्यमापन होत असतांना किंवा ए...

अव-काळाचे आर्त : स्वातंत्र्य-सुरक्षिततेचा सवाल!

तुमच्या स्वत:च्या अपत्याचे नाव ठेवायची परवानगी तुम्हाला नसेल तर काय होईल? किंवा नेमकी पाच-सहा नावेच सर्वांना वाटून दिली, तर? किती लोकांची नावे समान असतील? सपाट समानतेचा हाच डिस्टोपियन धागा पकडून आयरा लेविन यांनी ‘धिस परफेक्ट डे’ ही कादंबरी गुंफलेली आहे. १९६९ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीला तत्कालीन शीतयुद्धाची पाश्र्वभूमी आहे. त्यात स्टालिनवादानुसार चालणाऱ्या एका, भविष्यातल्या विश्वरूपी व्यवस्थेची कल्पना केली आहे, त्या व्यवस्थेला ‘कुटुंब’ असे म्हटले जाते. त्या कुटुंबातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय मायबाप सरकार घेताना दिसते. ‘चिप’ नावाच्या एका पुरुषाच्या आयुष्याभोवती ही कादंबरी फिरते. शाळेच्या पटांगणात खेळणाऱ्या चिप आणि इतर मुलांच्या संभाषणांतून समाजातील लोक दोन भागांत विभागले गेल्याचे वाचकाला दिसते. ज्याप्रमाणे हल्ली आपण धर्म, जात, वर्ण, पक्ष, देश आणि इतर गोष्टींच्या आधारे ‘ते आणि आम्ही’ अशा विभागण्या सहजगत्या करतो, अगदी त्याचप्रमाणे कादंबरीमध्ये ‘रोगट आणि निरोगी’ अशी लोकांची विभागणी दिसते. जगातील काही व्यक्ती एका असाध्य रोगाने पछाडलेल्या आहेत, अशी कादंबरीतली ...