Skip to main content

ठपकेबाजी

गेल्या ७ महिन्यात वेगवेगळ्या सदरामध्ये आपण समाजात असलेल्या विविध प्रकारच्या वर्गवारीवर प्रकाश टाकायचा प्रयत्न केला. त्यांचे प्रमाण, गुणधर्म, समाजावर होणारे परिणाम या बाबींचा पण विचार करण्यात आला. याप्रकारच्या वर्गवार्‍या भूतकाळात पण होत्या आणि त्या भविष्यकाळात पण राहणारच. त्यांना ओळखणे, त्याबद्दल विचार करणे आणि चर्चा घडवून आणण्याचे धाडस आपण अंगीकृत करणे ही काळाची गरज होत चाललेली आहे. आपल्या सतत प्रयत्नांनी आपण त्यांची तीव्रता आणि त्यांच्या होणार्‍या परिणामांवर मात्र थोडं का होईना आळा घालू शकतो.

आता चालू असलेल्या दशकामध्ये भारत देशाने आणि भारतातील जनतेने अनेक प्रकारचे चढ-उतार      (बहुतेक टोकाचे) बघितलेले आहे. यात सामाजिक, आर्थिक, धार्मिक, वैयक्तिक, शैक्षणिक, सांप्रदायिक,  इतर जटिल व न दिसणार्‍या बाबींचा पण समावेश आहे. मागील काही वर्षापासून एक वर्गवारी (तशी जुनीच) नव्याने वर डोक काढत आहे. ती वर्गवारी म्हणजे, समाजातील लोकांना आपल्या पूर्वग्रहीत विचारांमुळे सोयीस्कर अशे ठपके लावणे व या ठपक्यानुसार त्यांची विविध गटांत विभागणी करणे. प्रत्येक विभागाला एका विशिष्ट प्रकारची ओळख आणि विचारांची नेमणूक केली जाते. त्या ठराविक विचारांच्या आणि ओळखेच्या बाहेर त्यांना बोलण्याची मुभा नसते. असे केल्यास त्यांना विविध प्रकारच्या सामाजिक आक्रोशाला तोंड द्यावे लागते. याच सर्व प्रकारातून एक मोठा संच निर्माण होतो, “तुम्ही आणि आम्ही” असा.

शेती आणि उपजीविकेचा क्षेत्रात काम करत असल्याने सतत वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत असतात व हे अनुभव बर्‍याचदा लोकप्रिय किंवा लोकांना सोयिस्कर असलेल्या मतांपासून भिन्न असतात. भारतातील शेती आणि ग्रामीण भागातील रोजगाराची स्थिति सध्या दयनीय आहे हे सर्वांना माहीतच आहे. या परिस्थितीत काही तरी सुधार व्हावा या दृष्टीने या क्षेत्रातील कार्यकर्ते सरकारच्या मागे काही मागण्या धरून लावतात, इतर लोकांना या दयनीय अवस्थेबद्दल जागरूक करतात. असाच काही प्रयत्न आदिवासी बांधवांकरिता गेल्या कित्येक वर्षापासून होतो आहे. प्रस्थापित सरकार, भांडवलदार आणि छोटे-मोठे उद्योजक या व्यवस्थेपासून आदिवासी बांधवांचे व त्यांच्या अधिकारचे संवरक्षण व्हावे, त्यांच्या जमिनी लुबाडल्या जाऊ नये म्हणून बरेच लोकं त्यांच्या बाजूने सरकारशी आणि लोकांशी सतत चर्चा करत असतात. शेतकरी, शेतमजुर किंवा आदिवासी या सर्व लोकांचे प्रश्न आपण सर्वांना माहिती आहे तरीसुद्धा आपण या लोकांच्या हक्काबद्दल काम करणार्‍या कार्यकर्त्यांना एका विशिष्ट वर्गात बसवून देतो. या वर्गाचे नाव आहे “साम्यवादी” किंवा डाव्या विचारसरणीचे लोकं. म्हणजे फक्त लोकांच्या हक्काबद्दल बोलल्याने तुमच्यावर आयुष्यभरासाठी “डावे किंवा साम्यवादी” असा ठपका लावला जातो. अगदी हाच प्रकार दुसर्‍या बाजूला पण दिसून येतो. एखाद्या उजव्या विचारसरणीच्या व्यक्तीने कितीही खरी आणि तार्किक परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर तो उजव्या विचारसरणीचा असल्यामुळे तो मूर्खच असणार आणि त्यात काहीच तर्क नसणार असा ठपका पण आपणच लावतो. याच धर्तीवर ठपकेबाजी ही सर्वच क्षेत्रात दिसून येते. त्यामुळे एकदा कुणाला आपण ठपका लावला तर त्याचे मत आणि विचारांना क्षुल्लक ठरवण्यात आपण मोकळे.

मी ज्या क्षेत्रात काम करतो त्याचे सर्वस्वी ज्ञान आणि अनुभव मलाच आहे असा आपला समज होऊन बसतो. त्यामुळे नवीन अनुभव आणि नवीन ज्ञांनाला तिथे जागा नसते. प्रस्थापित ठपके लावणार्‍याना हे पाहिजेच असतं, कारण त्यामुळे त्यांचेच ज्ञान हे एकमेव मानले जात असते. पण या सर्व प्रकारात त्या क्षेत्राचे खूप मोठे नुकसान होते आणि परिणामी या वर्गवारीला कंटाळून बरीच लोक काम सोडून देतात.

मनुष्य हा तसा विचार करणारा प्राणी आहे (ते दिवसेंदिवस कमी होतं आहे तो एक वेगळाच विषय आहे). त्यामुळे त्याला प्रश्न पडत असतात, प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न होतो आणि आलेल्या अंनुभवातून मते बनवली जातात. ही मते घडण्यात बर्‍याच गोष्टींचा वाटा असतो. कधी कधी ही मतं पूर्वग्रह ठेऊन बनली जातात तर कधी कधी पूर्वग्रहाच्या अगदी उलट जाऊन. त्यामुळे जरी लोकं एका विशिष्ट वैचारिक किंवा इतर गटात मोडली जात असेल तरी त्यांचा मतांचा विचार व्हायलाच हवा, त्यावर चर्चा पण व्हायला हवी. हे सारखं सारखं घडत गेलं की विचारांमधील विविधतेचा स्वीकार वाढेल, लोकांमधील संवाद वाढेल व आपोआपच लोकांचे पूर्वग्रह दूर होऊन आपण मनुष्याला एक मनुष्य म्हणून बघायला सुरुवात करू.

 

Comments

Popular posts from this blog

सेंद्रिय अन्न: काळाची गरज

 गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, सुरक्षित अन्न या चळवळींनी शेतकरी-ग्राहकांमध्ये शेती आणि अन्नप्रणाली बद्दल मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण केली आहे. अगदी दहा वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजेच २०१२-१३ साली कच्च्या घाणीच्या तेलाचा किंवा सेंद्रिय शेतमालाचा साधा कुठे उल्लेख पण होत नव्हता आणि आज नागपूर मध्ये आपल्याला ठिकठिकाणी कच्च्या घाणीच्या तेलाचे आणि सेंद्रिय शेतमालाचे दुकान दिसायला लागले आहे. बाजारभावापेक्षा थोडा महाग असून सुद्धा लोकांचा कल या उत्पादनांकडे वाढतांना दिसतो आहे. मानवी आणि एकंदर पृथ्वीच्या आरोग्याचा विचार केला तर सध्याची आपली वाटचाल हि बरीच आशादायी आहे.   याच काळात कर्करोग, मधुमेह आणि इतर रोगांचा सुळसुळाट पण भरपूर वाढलेला दिसतो आहे. काही वर्षांपूर्वी कर्करोग व मधुमेह हे श्रीमंत आणि शहरी लोकांचे आजार समजले जायचे. आज परिस्थिती अशी आहे की कर्करोगाच्या निदानात फार नाविन्य राहिलेलं नाही आणि मधुमेह तर आज सर्वसामान्य होऊन बसला आहे. आज या रोगांची विभागणी शहरी किंवा ग्रामीण अशी होऊ शकत नाही. आपल्या आहारात वाढलेल्या साखर, मीठ आणि चरबीच्या प्रमाणामुळे व ...

"As A Country, We Need To Switch From Reactive To Proactive Ways Of Dealing With Issues Of National, Global Importance"

Last week, I spoke to a friend about the ongoing pandemic scenario and how most of our friends support people who need help. During this whole conversation, the thing which hit me the most was, she said, "Yaar, there was a lockdown and pandemic last year too, but it didn't affect me much the way this lockdown or the pandemic is affecting." This is because so many people are going through misery. So many people are dying due to lack of one or another thing. I replied immediately that "Last year, we were too involved in playing Ludo, making dalgona coffee, sharing stupid videos to realize that 30 Million people were walking towards their home without any help from the state or any institution and fellow countrymen." Many of us believe in Karma. If you do something good to someone, it will come back to you in one form or another. But, unfortunately, I think the same is happening with us. The kind ignorance we showed towards all the people walking back to their home...

वाघ एके वाघ.

बाबाराव , गेल्या ४ - ५ वर्षांपासून २मुख्य समस्यांनी ग्रासलेले आहे . पहिली समस्या म्हणजे जंगली जनावरांचा वाढत त्रास आणि दुसरी म्हणजे नाईलाजाने / बळजबरीने करावे लागणारे स्थलांतर . बाबाराव वर्धा जिल्यातील बोर जंगलाजवळ आमगाव जंगली या गावात गेल्या कित्येक पिढ्यांपासून वास्तव्यास आहे . नंदा गवळी या समाजाचे असल्याने गायी - म्हशी पाळणे हा त्यांचा पारंपरिक आणि मुख्य व्यवसाय . गावालगतच कुरण आणि जंगल यावर गाई - म्हशी साठी लागणाऱ्या चाऱ्याची मदार . त्यामुळे जंगलात गावातील लोकांचा आणि पशूंचा नेहमीच वावर असायचा . जंगलाचे संवर्धन हे गावपातळीवर सामूहिकरत्या व्हायचे . तेव्हापण जंगलात वाघ आणि इतर पशु होतेच , त्यांचा जन्म काही आता आरक्षित जंगल घोषित झाल्यानंतर नाही झाला . तरीपण याआधी बाबारावला   अश्या प्रकारची निसर्गाची किंवा नैसर्गिक साधनसंपत्तीची वर्गवारी कधीच आढळली नाही . सध्यस्थितीत जंगल आणि वाघाच्या संवर्धनाच्या नावाखाली जो काही घोळ सुरु आहे यावर बाबाराव ला हसावे कि रडावे हेच ...